मुंबई – महाराष्ट्रात आज ज्या घडामोडी घडल्या त्याला मी भूकंप मानत नाही. हे असेच घडणार हे सगळ्यांनाच माहिती होते. आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरचे सोळा आमदार अपात्र ठरणार, त्यांना कोणीच वाचवू शकत नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री लवकरच मिळणार आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपचे जे पोपटलाल राष्ट्रवादीच्या ज्या आमदारांच्या विरोधात आरोप करीत आहेत, ज्यांच्यासाठी तुरुंगाची दारे उघडी करण्यात आली होती, त्यांनीच आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपने आमच्या बाबतीत जे केले होते तेच त्यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर केले आहे.
पण आजच मी स्वताः आणि उद्धव ठाकरे यांनीही शरद पवारांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली आहे. ते आमच्या बरोबरच आहेत. आणि यापुढील काळात आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्रित लढू आणि पुन्हा नव्या जोमाने उभे राहून सत्ता स्थापन करू असा दावाही राऊत यांनी केला.
एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे आणि जे ताशेरे मारले आहेत, ते पहाता त्यांना अपात्र ठरवण्याखेरीज दुसरा मार्ग उरलेला नाही. शिंदे आणि अन्य सोळा आमदार अपात्र ठरतीलच पण नंतर भाजप बरोबर गेलेले शिंदे गटाचे सारेच आमदार अपात्र ठरतील असा दावाही राऊत यांनी केला.