उरुळी कांचन – येथील देवांश कांचन आणि द्रिव्या कांचन या पाच वर्षीय जुळ्या बंधू-भगीनीने आपल्या कुटुंबासमवेत राजगडाला गवसणी घातली आहे. लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि गड किल्ले यांचे बाळकडू आपल्या नातवंडांना देण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते नारायण कांचन व शिवाजी कांचन यांनी केले आहे. याचीच पोचपावती म्हणजे जुळ्या भाऊ बहिणीने किल्ले राजगडसर केला आहे.
देवांश आणि द्रिव्या सोबतच त्यांचा आतेभाऊ राजवर्धन शिवाजी महाडिक (वय 8) यानेही कामगिरी केली. महाराष्ट्राचा इतिहास अभेद्य ठेवायचा असेल तर लहानपणापासूनच मुलांमध्ये त्याची गोडी निर्माण करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे, अशी भावना निखिल शिवाजी कांचन यांनी व्यक्त केली. या मोहीमेचे आयोजन निर्माण उद्योग समुहाचे संस्थापक संदीप कांचन व निशांत कांचन यांनी केले होते.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुढच्या पिढ्यांना माहिती व्हावा. आपल्या गडकिल्ल्यांचे महत्व अबाधित राहावे. एवढ्या लहान वयातच किल्ले सर करायची गोडी लागल्यामुळे भविष्यात किल्लेसंवर्धन व दुर्गसंवर्धनाची प्रेरणा लहान मुलांमध्ये तयार होते. यातूनच पुढे ट्रेकिंगची आवड निर्माण होते.’
– नीलेश कांचन, उरुळी कांचन