मुंबई – ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. यांच्यावर शोकाकूल वातावरणात बुधवारी रात्री उशीरा पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नरके यांच्या पत्नी, मुलगी, नातेवाईक, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार कपिल पाटील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार तसेच विविध स्तरातील कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान, नरके यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र आणि ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवाणी यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबईतील लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारादरम्यान निष्काळजीपणा केला. हृदयविकाराचा धोका असताना त्यांच्यावर अस्थमाचे उपचार केले, असा आरोप सोनावणी यांनी केला आहे. नरके आणि सोनावणी यांच्यात झालेल्या व्हाट्सअॅप चॅटचा दाखला देत त्यांनी हे आरोप केले आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट आणि व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे.
22 जून 2023 ला त्या दोघांमध्ये संभाषण झालं होतं त्यांनी ते फेसबुवर शेअर केलं आहे. सोनावणी यांना पाठवलेल्या संदेशात हरी नरके लिहितात की, “प्रिय भाऊ, नमस्कार गुजरात जामनगर ला 3 आठवडे ट्रीटमेंट घेऊन पुण्यात घरी पोचलो आहे. अंगात थोडा ताप आहे. खूप अशक्तपणा आहे. बीपी लो आहे. आधी हातापायावर खूप सूज होती. शरीरात 20 किलो पाणी ज्यादाचे साठले होते. त्यामुळे किडनी व हार्टवर प्रेशर येऊन श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. ट्रीटमेंटमुळे 20 दिवसात 20 किलो पाणी ड्रेन झाले. त्यामुळे श्वास पूर्ण मोकळा झाला. मात्र बीपी 60 90 असे लो असून विकनेस खूप आहे.
लीलावती हॉस्पिटलच्या नामवंत डॉक्टरांच्या निष्काळजीपणे 10 महिने त्रास सहन करावा लागला. शिवाय हार्टफेल व किडनी फेलच्या धोक्याच्या 4थ्या स्टेजवर आलो होतो. जास्तीत जास्त 2 महिने लाईफ मिळाले असते. हार्टफेल व किडनी फेलने मृत्यू निश्चित होता. लीलावतीमधील नामवंत Cardeologist, pulminologist खूप लॅब रिपोर्ट मागवतात पण ते वाचत नाहीत. त्यामुळे हार्ट नॉर्मल आहे. किडनी नॉर्मल आहे. असे अँजिओग्राफी करून लेखी रिपोर्ट दिलेत त्यांनी. परिणामी फॉलोअपला पुण्याचे डॉ. अभिजित वैद्य, महेंद्र कावेडिया, औरंगाबादचे डॉ. आनंद निकाळजे सगळेच चकले. लीलावतीवाले हार्टऐवजी मला नसलेल्या अस्थमावर उपचार करीत राहिले. पण धाप लागणे वाढतच गेले. धोका वाढतच गेला. हा लीलावतीचा लॅब रिपोर्ट सांगतो हार्ट फेलचा धोका आठपट आहे, पण त्यांनी वाचलाच नाही आणि ऑल ओके असा चुकीचा रिपोर्ट लिहून दिला. तो 10 महिन्यात 21पट झाला होता.आता बरा होतोय.