हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – सोशल मीडियावर अनेकदा असे काही फोटो व्हायरल होतात जे ओळखण्यास कठीण जाते. अनेकदा कोडो टाकून त्याचे उत्तर सांगण्याचे आवाहन केले जाते. सध्या असाच एका झाडाच्या फुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फुल कोणत्या झाडाचे आहे? असे विचारण्यात येत आहे. दरम्यान हे फुल पळसाच्या झाडाचे असून ते उन्हाळ्यात फुलत असते.
सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. शिशिर ऋतू मावळून आता वसंत बहरत आहे. अशातच ठिकठिकाणी पळसाची फुलं रंग उधळताना दिसत आहेत. पळस म्हणजे पलाश वृक्ष… रानाचा अग्नी. इंग्रजीत तर त्याला ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ असे म्हटले जाते. वसंत ऋतूत फुललेल्या पळसाचे झाड सर्वांचेच लक्ष वेधून घेतेय. ग्रामीण भागात पळसाची झाडे अनेकांना मोहवून टाकत आहेत. उन्हाळा सुरू झाला की, झाडांना पानगळ लागते आणि निष्पर्ण वृक्षांचे सांगाडे पाहवयास मिळतात. अशावेळी उन्हाळ्यातही काही झाडे बहरत असतात. यातलाच एक पळस पिवळा, लाल जर्द पळस आपले लक्ष वेधून घेतो आहे.
पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. जेवण्याच्या पत्रावळीसाठी याच्या पानाचा वापर होतो. पळसाला गर्द केशरी रंगाची फुले येतात, काही ठिकाणी पिवळ्या रंगाची फुले सुध्दा येतात. महाराष्ट्रात हिवाळ्यात डिसेंबर-जानेवारीत फुले येण्याची सुरुवात होते. याच्या बिया फार कडू असतात. त्यास पळसपापडी म्हणतात. त्याचा औषधी उपयोग आहे. पोळा या सणाच्या वेळी पाच पानाच्या पळसाने बैलांचा खांदा मिळण्याची प्रथा आहे. पळसाच्या झाडाला बहुतांश तीनच पाने पाहायला मिळणात. यावरून “पळसाला पाने तिनचं” ही म्हणं मराठी रुढ झालेली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट असे म्हणतात. कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो संपूर्ण झाड पेटल्या सारखे दिसते.
हा पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. पत्रावळी लावण्यासाठी तिन पानापैकी केवळ टोकाचे (मधलेच) पान उपयोगी पडतात. या पत्रावळी लावण्यासाठी शक्य तो श्रावण-भाद्रपद महिन्यात पानांचा उपयोग होतो, या पत्रावळी टाचण्यासाठी लिंबाच्या झाडाच्या लिंबोळी येणाऱ्या काड्या किंवा ज्वारीच्या धांड्याच्या शिलका वापरतात. ह्या काड्या उन्हाळ्यात जमा करून ठेवाव्या लागतात. काही तर या पत्रावळीच्या व्यवसाय करत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत, आणि या पत्रावळीच्या वापरामुळे पर्यावरण संतुलित राखण्यासाठी मदत होत असे, पळसाच्या फुलांचा उपयोग शिमग्याच्या वेळी रंग तयार करण्यासाठी होत असे, त्याचे येणाऱ्या उन्हाळ्यात त्वचा व शरीर उन्हापासून रक्षण करण्यासाठी आयुर्वेदिक उपयोग होत असे. दरम्यान, आता त्याचा वापर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.