क्रांति म्हटले की घोषणा, चळवळ, युद्ध, निदर्शने असे काहीतरी डोळ्यासमोर उभे राहते. मात्र असे काहीही न करता समाजात बदल घडला तर…? तो बदलही कसा.. तर निस्वार्थ भावनेने माणसाला कार्यप्रवण बनविणारा, माणसामाणसातले भेद आपसुक मिटविणारा, सृष्टीकर्ता माझ्याप्रमाणेच दुसऱ्यातही असल्याच्या जाणिवेने दैवी भ्रातृभाव जपणारा. असा बदल येण्यासाठी एक वेगळीच समजूत असावी लागते. ही समजूत हजारों खेड्यापाड्यातील माणसा माणसात उभी करून दैवी क्रांति घडविणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते प्रातःस्मरणीय पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले म्हणजेच स्वाध्यायींचे लाडके दादाजी !
१९ ऑक्टोबर १९२० हा दादाजींचा जन्मदिवस. यावर्षीच्या १९ ऑक्टोबरला त्यांना १०१ वर्षे पूर्ण होतील. आज ते देहरूपात नसले तरीही प्रत्येक स्वाध्यायीच्या हृदयांत त्यांचे स्थान आहे असे स्वाध्यायी मानतात. समग्र स्वाध्याय परिवार १९ ऑक्टोबर हा दादाजींचा जन्मदिवस केवळ त्यांचा जन्मदिवस म्हणून न मानता मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतो. अर्थातच त्यामागची प्रेरणा स्वतः दादाजीच आहेत.
आज माणसाचा गौरव कशामुळे मानला जातो..? तर पद, प्रतिष्ठा, पैसा, अधिकार, बुद्धिमत्ता इत्यादी गोष्टींमुळे. मात्र माणसाला केवळ मी माणूस आहे म्हणून गौरव प्राप्त होतो का? याचे उत्तर नाही असेच बहुतांशवेळा दिसते. म्हणूनच मनुष्य गौरव दिनाला एक आगळे महत्व प्राप्त होते. या सृष्टीत अनेक प्रकारचे जीव-जंतू, कृमी-कीटक, पशू-पक्षी आहेत. मात्र या सगळ्यात माणूस काही वेगळाच आहे. या सृष्टीचे खरे सामर्थ्य माणसानेच ओळखले. त्याचप्रमाणे सृष्टीकर्त्याला ओळखण्याची शक्ति माणसामध्ये आहे आणि त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा भावसुद्धा माणसात आहे. म्हणूनच या सृष्टीत माणूस काही विशेष आहे. माणसाच्या अशा विशेषत्वाची जाणीव करून देणारा दिवस म्हणजे मनुष्य गौरव दिन !
या सृष्टीचा निर्माता, ज्याला आपण देव संबोधतो, माणसाकडूनच काही करवून घेतो आणि तो माणसामध्ये राहूनच हे करवितो असा पूर्ण विश्वास दादाजी व्यक्त करतात. माणसाला माणसाची ओळख देऊन त्यातील देवत्व जागृत करण्याचे दैवी क्रांतीचे अनोखे कार्य दादाजींनी केले आहे. तसेच हे कार्य करताना कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही, कोणतेही प्रलोभन दाखविले नाही किंवा कोणता धाकही दाखविला नाही. अतिशय निस्वार्थपणे दादाजींनी हे कार्य केले आहे. त्याचबरोबर असे कार्य करण्यासाठी हजारों स्वाध्यायींना दादाजींनी घडविले आहे. स्वतः अथक परीश्रम करून, देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवून, हे कार्य देवाच्या इच्छेनेच चालले आहे, म्हणून ते दैवी कार्य आहे असे सांगणारे आणि माणसामध्ये तो भाव जागविणारे दादाजी आजच्या काळातील दैवी क्रांतिकारीच म्हणावे लागतील.
देवाची पूजा करणारे करोडों आहेत, मात्र देवासाठी निस्वार्थपणे काम करणारा वर्ग दादाजींनी उभे केला. आपली कर्म-कुशलता भगवंताला अर्पण करून भक्ति करता येते. स्वकर्मणा तमभ्यर्च.. या गीतेच्या वचनाला दादाजींनी प्रत्यक्षरूपात साकार केले आहे. लौकिकाच्या पलिकडे पाहण्याचे सामर्थ्य असणाऱ्या ऋषींचे प्रयोग दादाजींनी आजच्या काळातही साकारले आहेत. दादाजींच्या या ऋषिप्रणित विचारातूनच योगेश्वर कृषीसारखे प्रयोग उभे झाले. त्यातून लाखों कृषिवल दैवी भ्रातृभावाने जोडले गेले आहेत. ज्यात कुणी नोकर नाही, कुणी मालक नाही, कुणाचे स्वामित्व नाही तसेच कुणी तटस्थही नाही. तरीही प्रत्येक जण निस्वार्थपणे काम करतो आहे. अशा पद्धतीने आज सुमारें १०,००० खेड्यांत योगेश्वर कृषीचा प्रयोग उभा आहे. खेड्यांप्रमाणेच अनेक शहरांमध्येही दैवी भ्रातृभावाने जोडलेले आणि निस्वार्थपणे कार्य करणारे हजारों कृतिशील दादाजींनी घडविले आहेत.
लाखों लोकांचे हृदय परिवर्तन निस्वार्थपणे करणाऱ्या या दैवी क्रांतीला खरोखरच आगळे महत्त्व आहे. कोणताही बोलबाला केल्याशिवाय, हलकल्लोळ केल्याशिवाय, शांतपणे, केवळ माणसाने माणसाला नि:स्वार्थपणे भेटूनसुद्धा इतकी मोठी क्रांती होऊ शकते यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र तो आता ठेवावा लागेल. माणसामाणसातले भेद सहजपणे मिटवून टाकणारी आणि माणसामाणसात दैवी भ्रातृभाव उभा करणारी अशी ही दैवी क्रांती जगात सर्वदूर पसरली आहे.
कोणतेही कार्य सांभाळणे हेही ते उभे करण्याइतकेच महत्वाचे आहे. सध्या जगभरातील स्वाध्यायींची संख्या काही लाखांच्या घरात आहे. हे इतके मोठे स्वाध्याय परिवाराचे कार्य धनश्री तळवलकर, ज्यांना स्वाध्यायी आपली मोठी बहीण मानतात व आदराने दीदी म्हणतात, त्या दीदी सांभाळीत आहेत. दादाजींच्या कोणत्याही मूळ संकल्पनेला धक्का न लावता आजच्या काळानुरूप कार्य सांभाळणे तसे महाकठीणच आहे. मात्र तरीही या प्रचंड कार्याची धुरा दीदीसुद्धा दादाजींप्रमाणेच अहोरात्र झटून, दादाजींनी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणेच वाहत आहेत. गेल्या दीड वर्षात सर्वांनाच एका वेगळ्या परिसिथितीला सामोरे जावे लागले. समाजातल्या जवळपास प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्यात हा काळ घालविला आहे. मात्र अशा काळातही समाजातील प्रत्येक स्तराचा विचार करून दीदींनी स्वाध्यायींना काही गोष्टी समजाविल्या व काही त्यांच्याकडून करवून घेतल्या. शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक आरोग्याची काळजीही दीदींनी घेतली आहे. कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक सावटाने समाजमनावर अधिराज्य गाजवू नये यासाठी दीदींनी स्वाध्यायींना काही गोष्टी करायला सांगितल्या. त्याचे सकारात्मक परीणामही आता दिसत आहेत. समाजातील प्रत्येक माणसाची चिंता करणाऱ्यांमध्ये सर्वांनाच आता दीदींचाही समावेश करावा लागेल. त्याची काम करण्याची पद्धत तर धडाडीची आहेच, परंतु दादाजींइतकेच स्पष्ट विचारही त्यांच्या वाणीतून व्यक्त होतात. म्हणूनच स्वाध्यायी त्यांच्या शब्दांवरही अतूट श्रद्धा ठेवतात.
१९ ऑक्टोबर, मनुष्य गौरव दिनानिमित्त स्वाध्यायी काही अनोखा संकल्प नक्कीच करतील. त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देऊन या दैवी क्रांतीचे प्रणेते असलेल्या पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) यांना नमस्कार करूया.
– अजय अनंत जोशी
सदाशिव पेठ, पुणे.