मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील वातावरणात मोठी घट होत आहे. त्यात आता राज्यात 48 तासांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तावण्यात आला होता. त्यानुसार आता पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, त्यामुळे शेतीच्या मशागतीची तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
हवामान खात्यानुसार, मुंबई, कोकण किनारपट्टीच्या भागात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अद्याप कमी न झाल्यामुळे नागरिकांना उन्हाचा आणखी तडाखा सहन करावा लागणार आहे. रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह इतर काही भागांध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्याच्या सर्वच भागांत कमाल तापमानाचा पारा 40 ते 45 अंशांच्या आसपास पोहचला.
त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून कडक उन्हामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. पण त्यांना आता दिलासा मिळणार आहे. कारण पुणे वेधशाळेने पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस बरसणार आहे. त्यामुळे तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत घसरू शकतो, असे हमावान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, 4 जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो.
“या’ जिल्ह्यांना इशारा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीगर, जालना, बीड, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली होती. तसेच विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्येही पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.