भुवनेश्वर – गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून झारखंड आणि पश्चिम बंगालच्या सीमाभागातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसात अतिवृष्टीची शक्यता भुवनेश्वरमधील हवामान विभागाने वर्तवली आहे.
या वादळामुळे बंगालच्या उपसागराच्या वायव्येकडील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे झारखंड आणि पश्चिम बंगालच्या दरम्यानच्या काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, असे भुवनेश्वर येथील हवामान संस्थेचे संचालक एच.आर.बिस्वास यांनी म्हटले आहे.
या काळात समुद्र खवळलेला असण्याची शक्यता असल्यामुळे मच्छिमारांनी 30 सप्टेंबरपर्यंत समुद्रात जाऊ नये असा इशाराही बिस्वास यांनी दिला आहे. ओडिशासह सर्व पूर्व किनारपट्टवर पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे, असेही म्हटले गेले आहे. गुलाब चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली आहे, असे हवामान संस्थेने सोमवारी म्हटले होते.