सातारा, -सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव नव्याने सादर करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
सातारा, जावळी, वाई व महाबळेश्वर तालुक्यांतील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतजमिनी व बंधाऱ्याच्या दुरुस्तीबाबत तसेच भूस्खलन प्रवण गावांच्या पुनर्वसनासंदर्भात अजित पवार
यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या मंत्रालयात मंगळवारी बैठक झाली. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, सार्वजनिक बांधकाम व मृद, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव, कृषी सचिव, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी शेखर सिंह व संबंधित अधिकारी उपस्थित होते. जुलै 2021 मध्ये सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील काही भागात दरड कोसळून गावांचे नुकसान झाले. त्या गावांचे लवकर पुनर्वसन होणे आवश्यक आहे. यामध्ये घरे आणि शेतीचे नुकसान झाले आहे. याबाबत नव्याने प्रस्ताव तयार करून द्या, अशा सूचना श्री. पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत ठेवून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.