Nepal Earthquake: नेपाळमध्ये शुक्रवारी बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यामध्ये 157 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या या भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी मोजली गेली. भूकंपामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले असून सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. रात्री 11.47 वाजता झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू जजारकोट जिल्ह्यात, राजधानी काठमांडूच्या पश्चिमेला 500 किलोमीटर अंतरावर होता.
रूकूम आणि जाजरकोट या ठिकाणी लोकांचा सर्वात जास्त मृत्यू झाला आहे. या भूकंपात हादरे भारतातील दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा, पंजाब या भागाला देखील भूकंपाचे धक्के जाणवले. जाजरकोट आणि रुकुम पश्चिममध्ये आतापर्यंत 157 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 200 लोक जखमी झाले आहेत.
आतापर्यंत भूकंपामुळे जाजरकोट जिल्ह्यातील 1 हजार 800 घरे आणि रुकुम पश्चिममध्ये 2 हजार 500 घरे उद्ध्वस्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी भूकंपग्रस्त भागाला भेट देत पाहणी केली. तसेच सरकारकडून पूर्ण क्षमतेने मदतकार्य केले जात असल्याची माहिती देखील दिली आहे.
भारताने नेपाळमध्ये राहणाऱ्या भारतीय भूकंपग्रस्तांसाठी+977-9851316807 हा आपत्कालीन क्रमांक जाहीर केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी 16 ऑक्टोबरला नेपाळमधील सुदुरश्चिम प्रांताला 4.8 क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. राजधानी काठमांडूला 3 ऑक्टोबरला 3 क्षमतेचा आणि 22 ऑक्टोबरला 6.1 क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेपाळमधील भूकंपात मरण पावणाऱ्या व्यक्तींबद्दल सहवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच भूकंपात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे. नेपाळमधील भूकंपामुळे झालेली जीवित हानी आणि नुकसान यामुळे तीव्र दुःख झाले आहे. नेपाळमधील नागरिकांच्या पाठीशी भारत ठामपणे उभा आहे आणि शक्य असेल ती सर्व मदत करण्यासाठी सज्ज आहे, असे मोदींनी ‘एक्स’वरच्या पोस्टमध्ये म्हटले होते.