म्हैसूर (कर्नाटक) – “रशिया- उक्रेन संघर्षात चीनने काहीतरी केले म्हणून नव्हे तर उक्रेनमधील स्थिती पाहून भारताने मदतीचा प्रयत्न केला,’ असे मत भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी मांडले. ते मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरील संवादात्मक सत्रात बोलत होते.
रशिया-युक्रेन संघर्षातील भारताच्या प्रयत्नांवर बोलताना जयशंकर म्हणाले, भारत कोणाशीही स्पर्धा करत नाही. खरे म्हणजे, संघर्ष सुरू झाल्यापासून आम्ही वेगवेगळ्या मार्गांनी उक्रेनला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदी हे अध्यक्ष पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशी सतत संपर्कात राहिलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. मी माझ्या समकक्षांच्या संपर्कात आहे.
जयशंकर पुढे म्हणाले, चीनने त्यांचे विचार त्यांच्या अधिकाराप्रमाणे मांडले आहेत. सौदी अरेबिया आणि इराणमध्ये जे काही घडले त्यात त्यांनीही योगदान दिले आहे. जानेवारी 2016 मध्ये रियाधने एका प्रमुख शिया धर्मगुरूला फाशी दिल्यानंतर इराणी निदर्शकांनी तेहरानमधील सौदी दुतावासावर हल्ला केला होता.
इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील वैमनस्य त्यामुळे वाढले. ते कुठेतरी कमी होताना दिसत असताना येमेनपासून सीरियापर्यंत मध्यपूर्वेतील संघर्षांना चीनने खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला.