श्रीमद भागवद् गीताच्या अकराव्या स्कंधात श्रीकृष्ण आणि उद्धव यांचा मोठा गोड संवादाचा भाग आलेला आहे. उद्धवाच्या कोण बद्ध आणि कोण मुक्त या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण उद्धवास सांगतात की, “”बा उद्धवा! अरे जो बांधलेला आहे, अडकलेला आहे, गुंतलेला आहे तो बद्ध आणि जो बांधलेला नाही, गुंतलेला नाही किंवा जो सर्वात असूनही कशातही अडकलेला नाही तो मुक्त.”
जीव हा जन्मापासून मरणापर्यंत सतत काहीना काही तरी कर्मे ही करतच असतो. नव्हे ती त्यास करावीच लागतात. त्या कर्मानीच त्याच्या परिणामास तो बद्ध होतो. माया, मोह, ममता ही मी मी म्हणाऱ्यांना सुटत नाही. मोहाचे पाश सहजासहजी तोडता येत नाहीत. परिणामी सुखासाठी केलेल्या प्रयत्नातून जीवास सुख न मिळता त्यास दु:ख, क्लेश, यातनाच भोगाव्या लागतात. जीव माया, मोह, ममतेच्या गुंत्यातच अडकतो.
“”उद्धवा! मला ठाऊक आहे आता तू असे विचारशील की, या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग नाही का? जर तो असेल तर नेमका कोणता? तर त्याचं उत्तर असं आहे की, खरं तर जीवाच्या हातून जे काही घडत असते ते मीच करत असतो. त्याचा करता हा तो नसतोच पण तो मात्र ज्ञानाने स्वत:सच त्या कर्माचा कर्ता मानतो. तो त्याचा मी चा कर्तेपणा, अहंकार त्यास बद्ध करतो. त्याच्या बद्धतेचे दुसरे कारण म्हणजे त्याच्या मनातली त्या मर्माची फलापेक्षा. ही अपेक्षा हेच एक बंधन आहे.”
“”उद्धवा! तू माझा प्रिय भक्त आहेस म्हणून मी तुला मुक्तीची युक्ती सांगतो. ती अशी की, जीवाने त्याच्या वाट्यास आलेली कर्मे तर चोखपणे करायची. पण त्याच्या कर्तेपणाचे ओझे स्वत:च्या खांद्यावर घ्यायचं नाही. कर्म बंधनातून सुटण्याची हीच खरी युक्ती आहे. ही युक्ती चातुर्याने वापरली की, तो जीव कर्मबंधाच्या बंधनात किंवा फलापेक्षेच्या आसक्तीत जीव अडकत नाही. जर प्रत्येकाने आपला संसार, प्रपंच हा ईश्वर साक्षीने व त्याच्या इच्छेने केला. आपल्या मनातली मीच कर्ता ही भावना विवेकाने, विचाराने दूर केली की तो जीव आपोआपच कर्मबंधन आणि फलासक्तीतून मुक्त होतो.
अरुण गोखले