पुणे -माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांनी बेछूट आरोप करत स्वत: अडचणीत येत आहेत. आम्ही सर्व फडणवीस यांच्या पाठीशी आहोत.
उलट, मलिक यांचे गैरव्यवहार फडणवीस यांनी उघडकीस आणल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला.
नवाब मलिक हायड्रोजन बॉम्बचा स्फोट करणार होते. पण, त्यांचा फुसका बार निघाला. उलट “टाडा’च्या आरोपींकडून कवडीमोल किमतीने जमीन खरेदीचे फडणवीस यांनी आरोप केल्यावर मलिक यांनी ते स्वतःच मान्य केले. मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हेगारांना मदत केल्याचा आणि राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा आरोप केला. भाजप हा आरोप स्पष्टपणे फेटाळत आहे, असे पाटील म्हणाले.
कोणावर तरी निष्ठा दाखवण्यासाठी खटाटोप
“फडणवीस यांनी आता एकाच विषयाची माहिती उघड केली आहे. त्यांच्याकडे अधिक माहिती आहे.
ते ही सर्व माहिती योग्य यंत्रणांकडे सादर करणार आहेत. त्यानुसार जी चौकशी आणि कारवाई होईल, त्याला तोंड देण्याचा विचार नवाब मलिक यांनी करावा. कोणावर तरी निष्ठा दाखविण्यासाठी फडणवीसांवर आरोप करत मलिक खड्ड्याच्या दिशेने धावत आहे,’ असे पाटील म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांना भाजप वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना पाठिंबा देण्याने राजकारण होत असेल, तर भाजपा ते राजकारणही करेल. राज्य सरकारने गेल्या 17 महिन्यांचा पगार द्यावा आणि 15 हजार रुपये बोनस द्यावा, या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात. त्यांच्या इतर मागण्यांबाबतही चर्चा होणे आवश्यक आहे.