काॅंग्रेस नेते मीनानाथ पांडे यांनी दिला बैठकीत इशारा
अकोले – कालव्याची दुरुस्ती करावी, लिकेज होऊ नये म्हणून सिमेंट काँक्रिटचे अस्तरीकरण करावे, तेव्हाच कालव्यात पाणी सोडावे, सध्याच्या कालव्याचे पाण्याचे रोटेशन त्वरित बंद करावे , अन्यथा त्रस्त झालेली तालुक्यातील जनता, शेतकरी आंदोलन करून पाणी बंद करतील, असा इशारा काॅंग्रेस नेते मीनानाथ पांडे आणि इतर आंदोलकांनी दिला.
तहसील कार्यालय येथे निळवंडे कालव्याच्या पाण्याचे रोटेशन बंद करावे, पिकांचे, शेतीचे नुकसान टाळावे, या संदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी महेश नवले, सोन्याबापू वाकचौरे, शिवाजी नेहे, डॉ. मनोज मोरे, कॉ. कारभारी उगले, सखाराम कोटकर, दशरथ कोटकर, बबनराव तिकांडे, विलास शेवाळे, कैलास फरगडे, भाऊसाहेब मेदगे व कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, उपअभियंता प्रमोद माने, शेतकरी प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी मीनानाथ पांडे यांनी कालव्यात पाणी सोडल्यामुळे होत असलेल्या नुकसानीची माहिती दिली. निळवंडे डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे अकोले तालुक्यातील शेती पाणथळ झाली. रस्ते जलमय झाले, पिके नष्ट झाली. कालव्याची चाचणी पूर्ण झाली असल्याने हे आवर्तन तातडीने बंद करावे, अशी मागणी केली.
महेश नवले म्हणाले की, कालव्याची कामे निकृष्ट झाली आहेत. तसेच हे नियमित रोटेशन नाही. इतके दिवस चाचणी असते का? अकोलेतील 10-12 गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरपाई द्यावी. दळणवळणाची अडचण झाली असल्यामुळे पाणी बंद करावे. रोटेशन हे पिकांना देण्याची पद्धत असते. तसे मागणी फॉर्म भरावे लागतात. ओढ्या नाल्यांना पाणी सोडून तळे भरण्याचा सपाटा चालू आहे. हे सर्व श्रेयवादासाठी चालू आहे. त्यामुळे तातडीने हे आवर्तन बंद करावे, अन्यथा शेतकरी त्यांच्या पद्धतीने बंद करतील, असा इशारा दिला. नायब तहसीलदार मुळे यांना लेखी निवेदन देण्यात आले.