पुणे – राज्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवायची चिंता कोणाचाच पडलेली नाही. यामुळे नागरिकांनाही महापालिका निवडणुकांचे काही देणे घेणे नाही. निवडणुकांचा उत्साह केवळ इच्छुकांमध्येच आहे. यामुळे निवडणुका लांबणीवर पडणार, हे आधीच निश्चित झाले होते. केवळ “ओबीसी’ आरक्षणाचे कारण पुढे करुन निवडणुका पुढे ढकलल्या. आता या महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच होणार आहेत, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, संदीप देशपांडे, रिटा गुप्ता, शिरीष सावंत, आमदार राजू पाटील, शहराध्यक्ष वसंत मोरे, बाबू वागस्कर, वनिता वागस्कर आदी उपस्थित होते.
राज्यातील महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शिक्षण, रोजगार, एस.टी. महामंडळाचा प्रश्न याबाबत काहीच बोलले जात नाही. केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यात सत्ताधारी व विरोधक गुंतले आहे. यातूनच एकमेकांवर छापे टाकले जात आहेत. नागरिक या आरोपांना, शिव्यांना कंटाळले आहेत.
भविष्यातील पिढी यातून काय शिकावे? या मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये संपणार आहेत. त्यानंतर सर्व फिरायला जातात. त्यामुळे मते मागायला कोणाकडे जायचे? असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यानंतर पावसाळा आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाणार हे उघड होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नक्कल करत ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. तर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे किती बोलतात, काहीही बोलतात, असे म्हणत ठाकरे यांनी त्यांचीही बोलण्याची नक्कल करुन दाखविली.
महिन्यातून दोन दिवस लॉकडाऊन करावा
करोनाच्या प्रादुर्भावामुळे सतत लॉकडाऊन करण्यात आले. या दोन वर्षांचा कालावधी कधीही न विसरण्यासारखा आहे. या काळात रस्ते शुकशुकाट पडले होते. शांतता पसरलेली आढळून यायची. केवळ पक्षांचा आवाज ऐकायला मिळायचा. आता करोनाचे संकट आटोक्यात येताच पुन्हा सर्वत्र गोंगाट सुरू झालेला आहे. दरम्यान महिन्यातून दोन दिवस लॉकडाऊन करावा असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहावेसे वाटते आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.