आळंदी – मुंबई ते आळंदी एसटी महामंडळाची बससेवा आजपासून (दि. 21) सुरू झाली आहे. मुंबईतून सकाळी 7 वाजता सुटलेली पहिली बस दुपारी दीड वाजता तीर्थक्षेत्र आळंदीत पोहोचली. दररोज सकाळी 7 वाजता बस मुंबई सेंट्रल येथून सुटणार असून दुपारी दीड वाजता आळंदीत पोहोचणार आहे. तर दुपारी पावणेदोन वाजता ही बस आळंदीहून पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे.
आळंदी हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी आहे. राज्यभरातून भाविक संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी येत असतात. मुंबईहून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. बस नसल्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाने ही सेवा सुरु केली आहे. या सेवेचा भाविकांना मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, आज शुक्रवारी पहिल्या बसचे आळंदीत आगमन झाल्यानंतर वाहक ज्योती मनसुख पावडे व चालक शिवाजी वाल्मिक पुरी यांचा माऊलींची प्रतिमा, ज्ञानेश्वरी ग्रंथ, शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच वाहक, चालक यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. माऊली देवस्थानच्या वतीने व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनीही त्यांचा सन्मान केला. यावेळी राहुल चव्हाण, ह. भ. प. नारायण महाराज काळे, मयूर कुऱ्हाडे, उदय महाराज डवळे, महादेव पाखरे, नंदकुमार वडगावकर, साईनाथ ताम्हाणे, हिरामण तळेकर, शशिकांत बाबर आदी उपस्थित होते.
बस मार्ग –
मुंबई (सेंट्रल) ते आळंदी (देवाची) ; भायखळा (प.) काळाचौकी, दादर, कुर्ला, घाटकोपर (प.), मानखुर्द, शिवाजीनगर (गोवंडी), सानपाडा, नेरूळ (एल.पी.), कामोठे, कळंबोली, पनवेल, खोपोली, लोणावळा, कार्ला फाटा, तळेगांव डेपो, भंडारा डोंगर, देहू फाटा, श्री क्षेत्र देहू, मोशी, आळंदी (देवाची). हाच परतीचा मार्ग असणार आहे.