मुंबई – गेल्या काही दिवसांपासून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील ‘संघर्ष’ चांगला गाजला. जिल्हा निवडणुकीच्या वादातून शिवसैनिक संतोष परब यांच्यावर केलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला. त्यामुळे त्याचा निकाल आज ( गुरूवारी ) होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तर दुसरीकडे सिंधुदुर्गात शिवसेना कार्यकर्ता संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतरच्या वादाचे पडसाद मुंबईतही उमटताना दिसून येत आहेत. मुंबईतील दादर परिसरात नितेश राणे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी तात्काळ ते बॅनर खाली उतरवले आहेत.
या बॅनरमध्ये ‘100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाहीत’ असा आशय लिहिण्यात आला होता. विशेष म्हणजे या बॅनरवर केंद्रीय मंत्री नारायण राणेंचाही फोटो झळकला आहे. या बॅनरबाजीबाबत माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे बॅनर खाली उतरवले आहेत.
दरम्यान,भाजपच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात निदर्शने केली. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनात येताच, आमदार नितेश राणे यांनी म्याऊ म्याऊच्या घोषणा दिल्या. त्यांच्या या नकळीचा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यातच जिल्हा निवडणुकीच्या वादातून शिवसैनिक संतोष परब यांच्यावर केलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणातून चांगलाच वाद रंगला आहे.