नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांना रान पेटवलं आहे. हे कायदे संमत करण्यास आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांचं कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन सुरूच आहे. वर्षभरात या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमावले आहे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कृषी कायद्यातील सुधारणा शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत. उलट काही दशकांपूर्वीच या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक होते पण त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत. तर काही पक्षांनी या सुधारणा कायद्यांना पाठिंबाही दिला होता मात्र, राजकीय स्वार्थासाठी त्यांनी काळानुरुप भुमिका बदलली. यापेक्षा दुर्भाग्य ते काय असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला.
ओपन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी विरोधकांना खडेबोल सुनावले. ते पुढे म्हणाले की, विरोधकांकडून कृषी कायद्याला होत असलेला विरोध म्हणजे राजकीय फसवेगिरी आहे. अनेक राजकीय पक्षांनी या कायद्याचे समर्थन केले होते. पण काळाच्या ओघात राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भुमिका बदलली जात असल्याचा आरोपही मोदी यांनी केला आहे.
दरम्यान सुधारित कायद्यामुळे तळागळातील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. पूर्वीच्या सरकारने लागू केलेल्या कायद्यामध्येच शेतकरी हिताच्या अनुशंगानेच बदल केल्याचे त्यांना स्पष्ट केले आहे. या कायद्याबाबत चुकीची माहिती हे विरोधक समाजात पसरवत असल्याचा दावाही मोदींनी केला.