पिंपरी, (प्रतिनिधी) – नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या (जिल्हा रुग्णालय) गलथान कारभारात आणखीन भर पडली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला ए पाॅझिटिव्ह रक्तपिशवीची आवश्यकता असताना बी पाॅझिटिव्ह रक्त दिले. रक्तगटात बदल झाल्याने रुग्ण अत्यवस्थ झाला.
पुढील उपचारासाठी तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्याची वेळ आली. रुग्णालयाच्या गलथान कारभाराने नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला. डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी नातेवाइकांनी केली आहे. रविवारी (दि. २४) ही घटना घडली.
नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा कामातील निष्काळजीपणा रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. याचा प्रत्यय रविवारी (दि. २४) आला. औंध येथील एक रुग्ण 21 मार्च रोजी दुपारी चार वाजता जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. संबंधित रुग्णाला श्वास घेण्यास अडचण येत होती. हात पाय सुजलेले होते.
पोट फुगलेले होते. तीन दिवसांपासून रुग्णावर उपचार चालू होते. 23 मार्च रोजी येथील डॉक्टरांनी त्यांचे रक्ताचे नमुने घेऊन रक्त कमी होते, असे सांगितले. त्यामुळे रक्त चढवावे लागेल असे डाॅक्टरांनी उपस्िथीत परिचारिकाला सांगितले. संबंधित रुग्णाचा रक्त गट ए पाॅझिटिव्ह होता. मात्र संबंधित परिचारिकेने रुग्णाला बी पाॅझिटिव्ह रक्त चढवले. कामात हलगर्जीपणा करत मोबाइलवर बोलत असल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. दोन रुग्णांच्या जीवावर हे बेतले आहे.
एका रुग्णाला रविवार डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे व संबंधित परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे दोन रुग्ण अत्यवस्थ झाल्याचे नातेवाइकांनी सांंगितले. सध्या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयातील उपचाराबाबत नातेवाइकांकडून तक्रारींच्या तक्रारीत वाढ होत आहे.
या तक्रारी कमी होण्याएवजी त्यामध्ये आणखीनच वाढ होत आहे. त्याला आळा घालण्यात रुग्णालय प्रशासनाला अपयश येताना दिसत आहे. या बाबत जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागनाथ यल्लमपल्ली यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.