– माधव विद्वांस
कलाप्रेमी सातारा जिल्ह्यातील औंधचे शेवटचे राजे भवानराव ऊर्फ बाळासाहेब श्रीनिवासराव (पंतप्रतिनिधी) यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1868 रोजी सातारा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे पार पडले. त्यानंतर त्यांनी पुण्याला डेक्कन महाविद्यालयातून वर्ष 1894 मध्ये बीएची पदवी प्राप्त केली व त्यानंतर एलएल.बी. करण्यासाठी ते मुंबईला गेले. परंतु मुंबईत कायद्याच्या अभ्यासापेक्षा त्यांचे लक्ष चित्रकलेकडे वळले. त्यांच्या वडीलबंधूंमुळे त्यांनी राजा रविवर्मा यांच्याशी ओळख झाली.
रविवर्मा चित्र काढीत असताना ते लक्षपूर्वक पाहत असत. त्यांनी पण चित्र काढण्याचा प्रयत्न सुरू केला तसेच फोटोग्राफीही ते शिकले. चित्रकलेच्या व्यासंगातून 1915 मध्ये त्यांनी एक सचित्र रामायण छापले. त्यातील 60 चित्रे त्यांनी स्वतः काढलेली आहेत. याच धर्तीवर महाभारतावर आणि शिवचरित्रावर पुस्तके काढून त्यातील चित्रे त्यांनी स्वतः रेखाटली. वेरूळ आणि अजंठा या त्यांच्या ग्रंथांत दोन ठिकाणच्या चित्र-शिल्पांविषयी त्यांनी लेखन केले.
मुंबई येथून परत आल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांची औंध संस्थानाचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक केली. वर्ष 1909 मधे ते संस्थानचे प्रमुख झाले. संस्थांचा कारभार हाती घेतल्यावर त्यांनी अनेक चांगले उपक्रम हाती घेतले. महात्मा गांधीजींना भेटण्यासाठी ते सेवाग्रामला गेले. महात्माजींनी त्यांना त्यांच्या संस्थानमध्ये लोकाभिमुख कारभाराची कल्पना राबविण्याचे सुचविले. त्याप्रमाणे त्यांनी संस्थानातील 72 गावांमध्ये ग्रामपंचायती स्थापन केल्या. शैक्षणिक संस्था उभारली. त्यावेळी कलागुणांना जोपासण्यासाठी संगीत क्षेत्र, कीर्तन व नाटकाच्या क्षेत्रातील अनेक कलावंतांना त्यांनी प्रोत्साहन आणि आर्थिक मदतही केली.
स्वदेशी आणि साक्षरतेचा प्रसार त्यांनी आपल्या संस्थानात केला तसेच मोफत शिक्षण 1927 पासून सुरू केले होते. त्यांनी किर्लोस्कर उद्योगसमूहाला कुंडल येथील माळाची जागा कारखान्यासाठी दिली. तसेच ओगले यांना काच कारखाना काढण्यासाठी साहाय्य केले. बेळगाव जवळील होसूर (गुणडाळ) येथे साखर कारखाना काढण्यासही मदत केली.
त्यांनी पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरास, तसेच बनारस हिंदू विद्यापीठास आर्थिक मदत दिली. त्यांना व्यायामाची आवड होती. सूर्यनमस्काराचे शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी दिले. आपल्या कीर्तनातून बलसंवर्धन आणि शरीराच्या आरोग्यासाठी सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवून दिले. त्यासाठी आहार आणि व्यायामशास्त्र या विषयांवरही त्यांनी पुस्तक लिहिले. आज औंध हे पर्यटन व धार्मिक ठिकाण म्हणून ओळखले जाते. त्यांनी उभारलेले भवानी संग्रहालय हे त्यांच्या कलाप्रेमाचे द्योतक आहे. त्यांनी वर्ष 1938 मध्ये श्री भवानी संग्रहालय व ग्रंथालयाची स्थापना केली. संग्रहालयात 8 हजारांपेक्षा अधिक वस्तू आणि ग्रंथालयात 16 हजार पुस्तके आहेत. त्यापैकी 3500 धार्मिक पुस्तके (हस्तलिखित) आदींचा समावेश आहे.
श्रीमंत बाळासाहेब महाराजांनी संग्रहशास्त्राचा अभ्यास करून परदेशी वास्तुशास्त्रज्ञांच्या मदतीने नैसर्गिक सूर्यप्रकाश, खेळती हवा आणि संरक्षण या गोष्टी विचारात घेऊन सध्याची संग्रहालयाची इमारत उभी केली. हे संग्रहालय निसर्गरम्य औंधच्या यमाई टेकडी परिसरात आहे. येथे सुप्रसिद्ध यमाई देवीचे मंदिर टेकडीच्या माथ्यावर सुमारे 800 फूट उंचीवर आहे. त्यांच्या साहित्यविषयक व्यासंगामुळे 1935 मध्ये इंदूर येथे झालेल्या विसाव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले होते. मुंबई येथे 13 एप्रिल 1951 रोजी त्यांचे निधन झाले.