नाशिक – दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून पायी दिंड्या पंढरपूरला जात असतात. तसेच संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरला जात असतात. यामधील संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून 2 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी या पायी आषाढी वारीचे प्रस्थान होणार आहे.
दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी होणारे प्रस्थान यंदाच्या वर्षी एक दिवस अगोदर त्रयोदशीच्या दिवशी होणार आहे. तसेच प्रथमच त्र्यंबकेश्वर येथेच प्रयागतीर्थाजवळील महानिर्वाणी आखाड्यात सद्गुरू श्रीगहिनीनाथ महाराजांच्या समाधी स्थानी गुरुघरी निवृत्तीनाथ महाराज पालखी पहिला मुक्काम करणार असून 7 जून रोजी दरवर्षींप्रमाणे सिन्नर तालुक्यातील दातली येथे पहिला रिंगण सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे पालखी एक दिवस अगोदर मार्गस्थ करण्याचा निर्णय निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे.
गुरु घरी मुक्काम करणार पालखी..!
ज्याप्रमाणे श्री ज्ञानोबाराय आळंदीहून प्रस्थान झाल्यावर आळंदीतच आजोळघरी मुक्कामी थांबतात त्याचप्रमाणे श्री संत निवृत्तीनाथ महाराज प्रयागतीर्थ जवळील महानिर्वाणी आखाड्यात त्यांचे सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराजांचे समाधी स्थानी गुरु घरी थांबतील, असा एकमताने निर्णय झाला असून याबाबतची माहिती संस्थांच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.