नगर, (प्रतिनिधी) – सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अर्चना अमोल गायकवाड (रा. एकता कॉलनी, केडगाव देवी रस्ता, केडगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या पतीसह चौघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत अर्चनाचा भाऊ आकाश हिरामन डंबाळे (वय 30 रा. एकता कॉलनी, केडगाव देवी रस्ता, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
पती अमोल रत्नाकर गायकवाड, सासरे रत्नाकर हरीभाऊ गायकवाड, दीर प्रमोद रत्नाकर गायकवाड (सर्व रा. बुर्हाणनगर ता. नगर), नणंद सविता संतोष रणदिवे (रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सन २०२१२ मध्ये अर्चनाचा विवाह अमोल सोबत झाला होता.
तेव्हापासून अर्चना सासरी नांदत असताना पती अमोल, सासरे रत्नाकर, दीर प्रमोद व नणंद सविता हे तिला वारंवार विनाकारण चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. तिला शारिरीक व मानसिक त्रास देत होते. यासंदर्भात वारंवार पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
दरम्यान त्यांच्या त्रासाला कंटाळून अर्चना गेल्या काही दिवसांपासून केडगाव उपनगरातील योगेश रतन पाडळे यांच्या घरी भाडोत्री खोलीत राहत होत्या. तरी देखील पती अमोल व इतर तिला त्रास देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून अर्चनाने ६ मे रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अर्चनाने आत्महत्या केल्यानंतर सुरूवातीला कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान अर्चना हिच्या आत्महत्येस पती अमोल व इतर जबाबदार असल्याचे समोर आले. त्यानंतर अर्चनाचा भाऊ आकाश यांच्या जबाब पोलिसांनी नोंदविला व गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील अधिक तपास करत आहेत.