manoj jarange – मराठा समाजावरील अन्याय दूर करण्यासाठीची आरक्षणाची लढाई सुरू आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. इतकं निष्ठूर सरकार कधी पाहिलं नाही. आरक्षण कसे देत नाही ते बघूच असा इशारा उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी बारामती येथून सरकारला दिला. आरक्षणाचा लढा जिंकल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी केला.
माध्यमांशी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले,’मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना मुदतवाढ देणार नाही. मुख्यमंत्री मराठा समाजाचा अवमान करणार नाही. मुख्यमंत्र्यांनीच एक महिन्याचा अवधी घेतला होता. दोन महिन्याची मुदत मागू द्या. मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यांनी 30 दिवस मागितले आम्ही 40 दिवस दिले. मुख्यमंत्री दगाफटका करणार नाही, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या पायाला हात लावून सांगतो. बाबा हो, आता आम्हाला 24 तारखेच्या आत आरक्षण द्या’ असेही मनोज जरांगे म्हणाले आहे.
तत्पूर्वी, आमच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी लढाई सुरू आहे. आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू ठेवायचा आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. कुणबी प्रमाणपत्र घ्यायला हरकत कशाला, असा सवाल जरांगे यांनी नारायण राणे यांना केला.
ते पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. आरक्षणास विरोध केला तर सोडणार नाही, आरक्षणाचा लढा आमच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आहे. ही लढाई गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. असेही मनोज जरांगे म्हणाले.