जालना : मनोज जरांगे पाटील हे मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण मिळण्यासाठी जालन्यातील अंतरवाली गावात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांचा उपोषणाचा नववा दिवस असून त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. उपोषण केल्यामुळे जरांगे पाटील यांच्या रक्ताची पातळी कमी झाल्याचे म्हंटले जात आहे. याप्रकरणी आता डॉक्टरांचं एक पथक उपोषणस्थळी दाखल झाले असून जरांगे पाटील यांच्यावर सलाईन लावून उपचार सुरु करण्यात आले आहेत.
मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यावर ठाम आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, मेलो तरी चालेल, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या उपोषस्थळी गेले होते. मात्र गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाला जरांगेंचं मन वळवण्यात अपयश आलं. मात्र सरकार लवकरात लवकर जीआर काढणार असल्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजनांनी जरांगेंना दिलं आहे. त्यावेळी संदीपान भुमरे यांनी जबाबदारी स्विकारली. मात्र, जरांगे मागे हटले नाही.
जरांगे यां नी सरकारला निर्णय घेण्यासाठी आणखी ४ दिवसांचा वेळ दिला आहे. सरकारच्या शिष्टमंडळात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. यावेळी महाजन यांच्याबरोबर मंत्री संदीपान भुमरे, माजी आमदार अर्जुन खोतकरही उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांनी जरांगे पाटलांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, “राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करतोय. आमची ही शांततेची लढाई सुरू आहे. पण तरीसुद्धा तुम्ही आमची डोकी फोडलीत.” समोर जखमी अवस्थेत बसलेल्या एका उपोषणकर्त्यांकडे बोट दाखवत मनोज पाटील म्हणाले, “ही बघा, तुमच्या पुढ्यात आहेत ही फोडलेली डोकी. आमच्या महिलांना उठता येईना, तुम्हाला त्या दिसेनात.” म्हणत सवाल केला.
दरम्यान, जालन्यातील अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला. त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली. अनेक नेत्यांनी जालन्यात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटलांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.