मुंबई :- राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा निर्णय शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच घेण्यात आला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची उकल केली आहे.
शरद पवार यांच्यासोबत माझी बैठक झाली होती आणि त्या बैठकीत सरकार स्थापनेचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र, अचानक शरद पवार यांनी माघार घेतली, असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.
फडणवीस पुढे म्हणाले, अजित पवार यांनाही विश्वास होता की, शरद पवार यांच्या संमतीनेच सरकार स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन केले. मात्र, नंतर शरद पवार आमच्या सोबत आले नाही आणि पुढे आम्हाला राजीनामा द्यावा लागला, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
तसेच ते पुढे म्हणाले, राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत सत्तेत येण्यास नकार दिला. त्याचवेळी आम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आपण सोबत स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करायला हवा, असा प्रस्ताव आला.
या संदर्भात शरद पवारांसोबत बैठक झाली व सरकार स्थापनेचे अधिकार अजित पवार आणि मला देण्यात आले. हे सर्व ठरल्यानंतर शरद पवारांनी अचानक यातून माघार घेतली, असेही ते म्हणाले.
तो निर्णय पक्ष नेतृत्वाचा
2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार आहोत. मात्र, निवडणुका झाल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? याचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना आहे. याविषयी बोलण्याचा अधिकार देखील मला नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया आहे. त्यानुसार संसदीय मंडळ याविषयीचा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.