कोल्हार – महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक रुपया पिक विमा योजना बळीराजासाठी आश्वासक आणि दिलासा देणारी असून अशी योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची बाब भूषणावह असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या विकास विषयक योजनांचा प्रसार आणि वंचितांना लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या सेवा, सुशासन आणि गरिब कल्याण कार्यक्रमाची नऊ वर्षे पूर्ण केल्याबद्दल कोल्हार भगवतीपूर येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री विखे यांनी मार्गदर्शन केले. तसेच विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांच्या तक्रारी समजून घेत अधिकाऱ्यांना त्या सोडविण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, प्रवरा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, माजी सरपंच ऍड. सुरेंद्र खर्डे, कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच निवेदिता बोरुडे, उपसरपंच सविता खर्डे, भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश दगडू खर्डे, विश्वस्त संभाजीराजे देवकर, वसंतराव मोरे आदींसह उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय घोलप, महावितरणचे अभियंता गाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वर्पे, जलजीवन प्राधिकरणाचे बी. डी. कांबळे, तलाठी अबुज यांचेसह कृषी अधिकारी उपस्थित होते.