पुणे – महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या निमित्ताने महापालिकेत दि. 1 मे रोजी ध्वजारोहनाच्या कार्यक्रमास पालिकेच्या मुख्य इमारतीमधील सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमासाठी अवघे दोनशे कर्मचारी उपस्थित राहिल्याचे समोर आले आहे. तर, ध्वजारोहनाची वेळ झाली तरी अनेक कर्मचारी उशिरा आल्याने गर्दीच नव्हती. त्यामुळे, संतापलेल्या महापालिका आयुक्तांनी अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र दिनानिमित्ताने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहन तसेच इतर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यानुसार, महापालिकेत आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार होते. त्यानुसार, सर्व कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले होते. तर काही कारणास्तव जे कर्मचारी या कार्यक्रमास येऊ शकणार नाहीत त्यांनी इतर शासकीय कार्यालयात उपस्थित राहून तसे पत्र देणे बंधनकारक होते.
मुख्य इमारतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना हा कार्यक्रम अनिवार्य होता, मात्र, मुख्य इमारतीमधील अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी केवळ दोनशे कर्मचारीच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यातही सुरक्षा विभाग तसेच महापालिकेच्या विभाग प्रमुखांची संख्या अधिक होती. त्यामुळे, कार्यक्रमाच्या वेळेसच आयुक्त कुमार यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी, संबधित अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त करत अनुपस्थित राहिलेल्या सर्वांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.