नवी दिल्ली – देशभरात टोमॅटोच्या किमतींनी मोठी उसळी घेतल्याने टोमॅटो चोरी आणि लुटीच्या अनेक घटना घडत आहेत. आता अशीच आणखी एक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत कर्नाटकातील कोलार येथून राजस्थानकडे निघालेला ट्रकच बेपत्ता झाला आहे. यात 20 लाख रुपये किमतीचे टोमॅटो भरलेले होते.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी कोलार पोलिसांकडे तक्रार दाखल केली. 27 जुलै रोजी कोलार एपीएमसी यार्डमधून राजस्थानमधील जयपूरला टोमॅटो घेऊन जाण्यासाठी दोन व्यापाऱ्यांनी ट्रक बुक केला होता. विशेष म्हणजे घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव आजही 15 किलोच्या बॉक्ससाठी 2000 रुपयांच्या आसपास आहेत. तर किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 150 ते 200 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. टोमॅटोने भरलेला ट्रक शनिवारी रात्री जयपूरला पोहोचणार होता. मात्र, तो जयपूरला पोहोचलाच नाही आणि चालकाचा मोबाईल फोनही बंद येत आहे.
ट्रक ऑपरेटरशी संपर्क साधण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरले. काही गैरप्रकार घडल्याची शक्यता असल्याने कोलारच्या व्यापाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, जीपीएस ट्रॅकरनुसार ट्रकने कोलारपासून सुमारे 1,600 किमी अंतर कापले होते. यानंतर हे वाहन कुठे गेले याचा काहीच पत्ता नाही.
ट्रकच्या क्लिनरकडे मोबाइल नसल्यामुळे ट्रकचा शोध घेण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. टोमॅटोने भरलेला ट्रक गायब झाल्याबद्दल व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. व्यापाऱ्यांनी म्हटले, की ट्रकला अपघात झाला असता तर आतापर्यंत माहिती मिळाली असती. चालक ट्रक घेऊन पळून गेला आहे किंवा टोमॅटो चोरून नेले आहेत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.