देहूगाव – सत्ता ही सेवेसाठी आहे. देहूकरांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाला जो विश्वास दिला आहे, त्यामुळे आपली जबाबदारी आता वाढली आहे. या भागातील सर्व सामाजिक समस्या सोडविणे हे आपले कर्तव्य आहे.
देहूकरांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदानाद्वारे जे भरभरून आशीर्वाद दिले, त्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी देहूकरांचे आभार मानले. तसेच देशभरातून देहूत वारकरी, नागरिक येतात, त्यांना हेवा वाटेल अशी देहूनगरी उभारू, असे आश्वासन खासदार सुळे यांनी दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व देहू नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या नागरी सत्कारानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.
खासदार सुळे म्हणाल्या की, आमदार सुनील शेळके हे नेहमीच विकास कामांसाठी आग्रही असतात. त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत घेऊन देहूकारांच्या सर्व समस्या सोडवाव्यात. तसेच विकासकामे करत असताना देहू शहराची असलेली ऐतिहासिक ओळख कायम ठेवावी. देहूमध्ये श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून नागरिक येत असतात. यामुळे आयुष्यात एकदा तरी देहूला जावे, असे परराज्यातील नागरिकांना वाटले पाहिजे, अशी क्षेत्र देहू शहराची ओळख बनवू. महाराष्ट्रातील संतांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहचला पाहिजे यासाठी कार्य करा. प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावून त्याचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करा, असे आवाहन देखील यावेळी खासदार सुळे यांनी नागरिकांना केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बबन भेगडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, देहू शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हा निरीक्षक रुपाली दाभाडे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, वैशाली टिळेकर व राष्ट्रवादीचे निवडून आलेले सर्व नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी देहू शहरात आल्यावर प्रथम विठ्ठल मंदिर व श्री संत तुकाराम महाराज यांच्या जन्मस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शहरात विविध ठिकाणी पाहणी केल्यानंतर विकास कामांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
नागरिकांच्या समस्या सोडविणार – सुनील शेळके
निवडणुकीनंतर शाबासकीची थाप देण्याकरिता सुप्रिया सुळे आज देहूत आल्या आहेत. मागील दोन वर्षांच्या काळात देहू शहरातील रस्ते, पाणी यासारखी विकासकामे केली. त्या विकास कामांना प्रभावित होऊन देहू नगरपंचायत निवडणुकीत देहूकरांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. देहूतील जनतेने विश्वास ठेऊन आम्हाला एकहाती सत्ता दिली आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्याची आणि सुविधा देण्याची जबाबदारी आमची असून, यासाठीच आजपासून देहू शहरात जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या निवडणुकीत भाजपाच्या शहर अध्यक्षांना केवळ 17 मतांवर समाधान मानावे लागले. 6 उमेदवारांचे तर डीपोझीट देखील जप्त झाले असल्याचे यावेळी आमदार शेळके यांनी सांगितले.