कोल्हापूर – गेली दीड वर्ष करोनाविरुद्धच्या लढ्यात आपण काही प्रमाणात यशस्वी झालो. मात्र यापुढे गाफील राहून चालणार नाही. नागरिकांनी, “माझं कोल्हापूर-निरोगी कोल्हापूर’ हा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडला. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने आगामी काळात नदीकाठच्या गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करणार आहोत.
जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांसाठी यंदा “पब्लिक ऍड्रेस सिस्टीम’ सुरू केल्याने आपण जीवित व पशूहानी टाळण्यात यशस्वी झालो. तसेच ही सिस्टीम टप्याटप्याने संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी पूरपरिस्थितीत साडेतीन लाख लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याने प्रशासनाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या तिसऱ्या लाटेकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये, असे आवाहन केले.