पुणे – पुणे-नाशिक महामार्गावर बिबट्याचा वावर असल्याची खात्री पटल्यानंतर आता पुणे – नाशिक महामार्गावर वनविभागाने फलक लावण्याला सुरुवात केली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपासून त्याची सुरूवात झाली असून, नारायणगावजवळ तीन ठिकाणी बसवण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही संकेतफलक लवकरच बसवण्यात येतील, असे वन अधिकाऱ्याने सांगितले.
पुणे-नाशिक महामार्गावर बिबट्यांचा मृत्यू हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे हा महामार्ग ओलांडणाऱ्या वन्य प्राण्यांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. या महामार्गावर बिबट्यांच्या अपघाती मृत्यूबाबत प्राणीप्रेमींनी वारंवार चिंता व्यक्त केली होती, काहींनी वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित कॉरिडॉरची मागणीही केली होती, जेणेकरून वन्यप्राणी सुरक्षितपणे जाऊ शकतील.
नुकतेच १७ डिसेंबर रोजी नारायणगावजवळ सुमारे आठ ते नऊ वर्षे वयाच्या नर बिबट्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. या महामार्गावर गेल्या वर्षभरात लांडगे, हायना, बिबट्या यांच्यासह अनेक प्राण्यांचा मृत्यू झाला होता. अलिकडच्या वर्षांत अशा रस्त्यावरील घटनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नारायणगाव परिसराजवळून वारंवार महामार्ग ओलांडणाऱ्या प्राण्यांसाठी सुरक्षित मार्गाची मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे.
प्रदीर्घ प्रलंबित मागणी लक्षात घेऊन जुन्नर – वनविभागाने भारतीय वन्यजीव संस्थेच्या (डब्लूआयआय) संशोधकांच्या मदतीने २०२२ मध्ये पुणे-नाशिक महामार्गावरील वन्यजीव क्रॉसिंग हॉटस्पॉटचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये विभागाने अनेक पॅच शोधले आहेत. या हॉटस्पॉट्सची ओळख पटल्यानंतर विभागाने या स्पॉट्सवर सिग्नल बसवण्यास सुरुवात केली. आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी असे तीन फलक लावले आहेत, जे वन्यजीव क्रॉसिंग क्षेत्र सूचित करतात आणि वाहन चालकांना सावकाश चालण्याचे आवाहन करतात, असे जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.
नारायणगाव हा भाग वन्य प्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा का?
महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या शेतजमिनी आहेत, या जमिनींवर प्रामुख्याने उसाचे उत्पादन घेतले जाते. शिवाय डिंभे धरण कालवा आणि मीना नदीदेखील या परिसरात वाहते. ज्यामुळे वन्य प्राण्यांना सुरक्षित अधिवास मिळतो. त्यामुळे या परिसरात अनेक वन्य प्राण्यांचे वास्तव्य असून, सायंकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी हे वन्य प्राणी भक्ष्याच्या शोधात या परिसरात फिरतात आणि अशा वाहन अपघातांना बळी पडतात.
वनविभागाची अशीही खंत
पायाभूत सुविधांचा विकास ही अत्यावश्यक बाब असली, तरी चुकीच्या पद्धतीने नियोजित प्रकल्पांमुळे अशा दुःखद घटना घडू शकतात. अशा रस्ते अपघातांच्या समस्यांवर नेहमीच उपाय असतो. मात्र, अनेकवेळा असे प्रकल्प आखताना वनविभागाला विचारात घेतले जात नाही. त्यामुळे अशा पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची आखणी करताना संबंधित अधिकाऱ्यांनी वनविभागाचा सल्ला घ्यावा, असे एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.