पिरंगुट, (वार्ताहर) –अनेकदा रागाच्या भरात अघटित घटना घडत आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. विशेषतः तरुण वर्गाने रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे, असा सल्ला हभप युवकवीर माऊली महाराज पठाडे यांनी दिला.
पिरंगुट (ता. मुळशी) येथील कॅम्प परिसरातील बालवीर युवक मंडळाच्या वतीने श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व मंदिर कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी आयोजित कीर्तन सेवेत ते बोलत होते. बालवीर मंडळाच्या वतीने संपूर्ण दगडात नवीन मंदिर बांधण्यात आले आहे. आपल्या चुकीच्या वर्तनाने आईच्या डोळ्यात पाणी येणार नाही आणि वडिलांची मान खाली जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.
महापुरषांच्या विचारांची जयंती साजरी झाली पाहिजे. देशात अधर्म वाढत असून अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद वारकरी सांप्रदायात आहे, असेही पठाडे महाराज यांनी यावेळी सांगितले.
यानिमित्त मंदिराचा कलशारोहण व श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बीड येथील कानिफनाथ गडाचे महंत लक्ष्मण महाराज फड व आचार्य मंदार स्वामी येनपुरे यांच्या हस्ते संपन्न झाला. सलग चार दिवस मंडळाच्या माध्यमातून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष व माजी उपसरपंच रामदास पवळे आबिाजार समितीचे संचालक तुषार पवळे यांनी दिली. बालवीर युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन केले होते.