– सारंग कुलकर्णी
महात्मा गांधी यांचे विचार जगभर पोहोचले आहेत, अनेक देश महात्मा गांधी यांची विचारसरणी अनुसरत आहेत, ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच जगाला नव्याने भारताची ओळखही होत आहे. जुना भारत आता कात टाकतो आहे आणि नव्या रूपात जगासमोर येतो आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती सोमवारी भारतात साजरी करण्यात आली. जगातही या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस पाळण्यात आला. महात्माजींना जाऊन आता जवळपास पाऊण शतक झाले आहे. तरीही त्यांच्या विचारांचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. किंबहुना आंतरराष्ट्रीय पटलावर गांधी विचारांची महत्ता आता अधिक अधोरेखित झाली आहे. जगातील बड्या नेत्यांना या कृश तरीही सगळ्यात शक्तिशाली मानवाची नव्याने ओळख होते आहे. जेथे जेथे बापू पोहोचले आहेत तेथे भारतही पोहोचला आहे. त्यामुळेच अमेरिकेतही गांधी जयंतीचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्याच सुमारास झालेल्या कार्यक्रमात भारताचे आजचे जगातले स्थान आणि अमेरिकेत वाढलेला दबदबा याचीही प्रचिती आली.
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आठवडाभर अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी जागतिक नेते उपस्थित असलेल्या मंचांवरून भारताची भूमिका मांडली. कोणाच्या मनात कोणताही किंतू राहू नये अशा थेट शब्दांत ती मांडली. भारताबाबत कोणी अजूनही मागच्या शतकात जाऊन विचार करत असेल तर त्यांनी त्या चुकीची दुरुस्ती आताच करावी हा त्यांच्या विधानांचा सार होता. काही आठवड्यांपूर्वीच भारतात जी20 परिषद झाली. हत्ती आणि सापांचा देश असलेल्या भारताने जगातल्या महासत्तांच्या प्रमुखांचे यजमानपद एकट्याने स्वीकारले आणि योग्य आदरातिथ्य करत जगाला त्याची दखलही घ्यायला लावली. जी20 काही तासांचीच होती. तथापि, त्याचे कवित्व पंधरवडाभर सुरू होते. कोणी याचा संबंध भारतातील विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या कथित इव्हेंटबाजीशी जोडला.
कोणी काय पाहावे आणि विचार करावा हा ज्याचा त्याचा अधिकार. लोकशाहीत तेवढे स्वातंत्र्य असतेच. विरोधकही सत्ताधाऱ्यांच्या भपक्यात झाकोळले गेले तर लोकशाहीवर अंधार दाटण्याची शक्यता अधिक. विरोधकांनी उणिवा शोधायलाच हव्यात, तशा त्या शोधल्या गेल्या आणि त्यावर बोटही ठेवले गेले. हा झाला देशांतर्गत मामला. खरी कसोटी आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली. कॅनडाने केलेल्या आरोपांमुळे जी20 मुळे निर्माण झालेले वातावरणच नासवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न झाला.
कॅनडातील एका दहशतवाद्याच्या हत्येचा आरोप भारतावर करण्यात आला. अमेरिकेनेही भारताला तपासात सहकार्य करण्याचा सल्ला अप्रत्यक्षपणे दिला. योगायोग असाच की याच सुमारास जयशंकर यांचा अमेरिका दौरा झाला आणि त्यांनी तेथे काय सांगायचे ते रोखठोक शब्दांत सांगितले. भारताविरुद्ध उपस्थित केल्या गेलेल्या सर्वच मुद्द्यांना त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या व्यासपीठावरून मुद्देसूद उत्तरे दिली. विशेष म्हणजे आपण कोणत्या व्यासपीठावर उभे आहोत याचे पूर्ण भान राखत त्यांनी सगळ्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आणि महासत्ता म्हणवणाऱ्यांना कानपिचक्याही दिल्या. पूर्वी काही मूठभर देश एकत्र बसून संपूर्ण जगाचा अजेंडा निर्धारित करत होते. तो काळ आता राहिलेला नाही हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी अर्थातच कोणत्या देशाचे नाव घेतले नाही, मात्र बाण कोणासाठी सोडला आहे ते झाकून राहिले नाही.
न्यूयॉर्कच्या परराष्ट्र संबंधविषयक परिषदेतही जयशंकर यांनी ठोस भूमिका घेतली. कॅनडाकडे जर आरोपांच्या पुष्ट्यर्थ पुरावे असतील, तर भारत त्याचा निश्चितच विचार करेल. पण गेल्या काही वर्षांत कॅनडात भारताच्या विरोधात संघटित गुन्हेगारी वाढली आहे. विभाजनवादी प्रवृत्तींना बळ मिळाले आहे, भारतीय अधिकाऱ्यांना धमक्या आणि दूतावासावर हल्ला झाला त्याचे काय? कॅनडाला याबाबत ठोस पुरावे आणि माहिती दिल्यावरही कारवाई झाली नाही उलट भारतविरोधी शक्तींच्या लोकशाही अधिकारांचा पाठ आम्हाला शिकवण्यात आला आणि
हे असे कसे चालेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भारताला अप्रत्यक्ष सल्ला देणाऱ्या अमेरिकेच्या संदर्भात बोलायचे झाले, तर अमेरिका कॅनडा प्रकरणात किंवा अन्य जागतिक फौजदारकी करण्याच्या प्रयत्नांत भारताला फार दुखावण्याचा प्रयत्न करेल अशी स्थिती आज नाही आणि त्यांनी तसे करूही नये, हेही अमेरिकेतच तेथील बायडेन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या एका कार्यक्रमात स्पष्ट झाले. गंमतीने तेथील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आज अमेरिकेच्या प्रशासनाची अशी स्थिती आहे, की तुम्ही व्हाइट हाउसवर एक दगड भिरकावला आणि तेथे तो कोणा भारतीयाला लागला नाही असे क्वचितही घडणार नाही. या विधानाचा अर्थ हा की अमेरिकेच्या प्रशासनातील सर्वच स्तरावर भारतीय त्यांच्या बुद्धीने, कष्टाने आणि अंगभूत गुणांमुळे महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.
जयशंकर यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात या सर्व भारतीयांची केवळ उपस्थितीच नव्हती तर त्यांनी भारत-अमेरिकेतील नव्या उंचीवरच्या संबंधांची वाखाणणा केली. याचे श्रेयही त्यांनी जयशंकर यांना दिले. केवळ दोन देशांपुरते हे संबंध दृढ नसून व्यक्ती स्तरावर आणि प्रशासनाच्या स्तरावरही उभय देशांतील धागा बळकट होत असल्याचे सूचित करणारा हा कार्यक्रम होता. भारतीय वंशाच्या एका प्रख्यात डॉक्टरांनी जे विधान केले ते अत्यंत महत्त्वाचे आहे. इथे अमेरिकेत आम्ही काही नेत्यांनी महात्मा गांधींचे विचार आणि मूल्ये रूजवली आहेत, त्यांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही आम्ही सगळे भारतीय त्याहीपलीकडे अमेरिकेतच नाही, तर संपूर्ण जगात आणखी भरीव काम करू शकतो. गांधीजींचे सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यांचे महत्त्व जगात पुन्हा एकदा अधोरेखित होते आहे.
एका सर्वशक्तिमान साम्राज्याच्या विरोधात महात्मा गांधी यांनी निशस्त्र लढा दिला होता. अंतर्गत मतभेद, कलह आणि असमानता असे अनेक खड्डे होते. शिक्षणाचा अभाव होता, गरिबीशी लढा होता तरीही भारताला सुसंघटित करत जाती आणि पंथांच्या पलीकडे एका विचाराशी त्यांनी देशवासीयांना बांधले होते. त्यांच्या विचारांचे ते सूत्रच जगभरातील भारतीयांना एकत्र ठेवण्यात आजही यशस्वी ठरते आहे आणि आपल्या गांधी विचारांच्या वारशाचा जगातल्या सगळ्यांच प्रशासनांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या भारतीयांना अभिमानही आहे.