वडूज – करोनामुळे सर्वकाही बंद असल्याने शेतात पिकविलेला भाजीपाला न्यायचा तरी कुठे? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. खटाव तालुक्यातील शिगाडवाडी (कातरखटाव) येथील एका कोबी उत्पादक शेतकऱ्याने बाजारपेठेअभावी लाखो रुपये खर्चून पिकविलेला कोबी अक्षरश: जनावरांच्या दावणीला टाकला आहे.
सध्या सुरु असलेल्या करोना साथीच्या काळात सामान्य जनता, व्यापारी, मोठे उद्योजक यांच्याबरोबरच शेतकऱ्यांनाही चांगलाच फटका बसला आहे. असाच एक शिगाडवाडी (कातरखटाव) येथील शेतकरी शहाजी जगन्नाथ खरात. या शेतकऱ्याने इतरांची उसनवारी देणी देण्याच्या हेतूने कोबीचे पिक घेतले. उसाच्या पीकातून उत्पन्न कमी मिळेल म्हणून उसामध्ये कोबीचे आंतरपिक घेतले. पंधरा हजार रुपये खर्च करून सांगली येथून रोपे आणली. लागवडीसाठी सहा हजार रुपये खर्च केले. दुष्काळ असूनही पोटाला चीमटा काढत कोबी पीकाकडे लक्ष देवून चांगल्या प्रकारचे पिक आणले. परंतु अचानक आलेल्या करोना साथीने साऱ्या केलेल्या कष्टावर पाणी पडले. पीक काढणीस येताच लॉकडावून झाले. सर्व वाहतूक बंद झाली.
सर्व मार्केट बंद झाले. आता कोबी घालवायचा कुठे? असा प्रश्न खरात यांना निर्माण झाला. वाटले होते लॉकडाऊन झाल्यानंतर कोबी मार्केटला नेता येईल पण लॉकडाऊन वाढतच चाललाय. स्थानिक व्यापारीही पाच किंवा दहा कोबी खरेदी करताहेत. मग एवढ्या कोबीचे करायचे काय? काहीच करता येईना म्हणून शेवटी कोबी जनावरांना घालायला सुरूवात केली. सर्व कोबी पिकाची जर बाजारात विक्री झाली असती तर सव्वा लाख रुपये झाले असते, असे खरात यांनी सांगितले. या करोनासाथी मुळे माझ्यावर पुन्हा आर्थिक संकट ओढावले आहे, असे खरात यांनी बोलताना सांगितले.