इंदापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे हरभरा, गहू झोपला
रेडा – इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेली पीके गारपिटीच्या तडाख्याने जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे करोना, संचारबंदी, लॉकडऊनमध्ये घेतलेल्या शेतकऱ्याला आता गारपीट व अवकाळी पावसाने मारल्याने बळीराजाचा आणखी किती अंत निसर्ग पाहणार आहे, असा सवाल आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर, निमसाखर, काटी, सराफवाडी, वरकुटे, निमगाव केतकी अन्य परिसरात शनिवारी (दि. 18 ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.नीरा खोऱ्यातील गावांमध्ये शेतकरी गव्हाचे पीक घेतात. सध्या हा गहू काढणीला आला आहे. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे मळणी मशीन मिळत नसल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचा गहू शेतातच उभा आहे. त्यातच या झालेल्या प्रचंड गारपिटीमुळे शेतातील गहू भूईसपाट झाला आहे. तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील गहू गारपिटीने झोपला आहे. तो आता मशिनच्या साहाय्याने कढता येणार नाही, त्यामुळे मजुरांची मोठी आवश्यकता आहे. मात्र लॉकडाऊनमुळे गावाकडे मजूर घरातून बाहेर निघत नाहीत. त्यामुळे हा गहू निघणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांची दुभती जनावरे व बैल, म्हैस, शेळ्या- मेंढ्या यांना शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कडवळ चारा पीक केले होते. वादळी वारा सुसाट असल्यामुळे हे कडवळ पीक जमिनीदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जनावरांना खाद्य म्हणून आगामी काळात काय द्यायचे असा प्रश्न भेडसावणार आहे. वरकुटे खुर्द, निमगाव केतकी, काटी परिसरात भाजीपाला शेतकरी मोठ्या प्रमाणात लावतात. यामध्ये वांगी, भेंडी, आळूची पाने, दोडका, मिरची या सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आळूच्या पानांची चाळण झाली आहे. त्यामुळे यातून मिळणारे उत्पन्न व झालेला खर्च कुठेही ताळमेळ लागणार नाही. म्हणून अशा शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात, यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
- ढीग लावलेला कांदा गेला पाण्यात
कांद्याला दर चांगला मिळतो आहे म्हणून 22 गावातील शेतकरी व निमगाव केतकी परिसरातील शेतकऱ्यांनी सर्रास शेतामध्ये कांद्याचे पीक घेतले होते. हे पीक बहुतेक शेतकऱ्यांचे काढून शेतातच ढीग लावून ठेवला होता, अचानक झालेल्या गारपिटीमुळे ढीग लावलेला कांदा पाण्यात गेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, असे मत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.