कोल्हार – राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द आणि चिंचोली या दोन्हीही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. जलजीवन मिशन योजने अंतर्गत वरील दोन्हीही गावांसाठी तब्बल नऊ कोटी रुपये खर्च करून प्रत्येक नागरिकाला जलजीवन मिशन अंतर्गत स्वच्छ पाणी देण्याचा शासनाचा मानस आहे.
गेल्या वर्षभरापासून सुरू झालेल्या या कामात ठेकेदाराची दिरंगाई, शासकीय अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा आणि स्थानिक राजकारण्यांचा हस्तक्षेप यामुळे हे काम बारगळले. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही योजना मृगजळ ठरते की काय, असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. कोल्हार खुर्द आणि चिंचोली या दोन्हीही गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी एकच साठवण तळे गेल्या अनेक वर्षांपासून आहे.
याच तळ्याचे खोलीकरण करून या दोन्हीही गावातील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरून जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना मंजूर करण्यात आलेली आहे. 2022-23 मध्ये मंजूर झालेल्या या योजनेचे काम जवळपास सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेले होते. मात्र, गावातील अनेकांच्या शंका-कुशंका, शासकीय अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा, राजकीय हस्तक्षेप अशा अनेक कारणांमुळे या योजनेचे काम रखडले आहे.
नव्याने पदभार स्वीकारलेले ग्रामपंचायत सदस्य, सरपंच हे याकडे लक्ष घालायला तयार नाहीत. योजनेचे काम मिळवण्यासाठी नेत्यांचे उंबरठे झिझवणारा ठेकेदार देखील काम करण्यास उत्सुक दिसत नाही. त्यामुळे ही योजना पूर्ण होईल की मृगजळ ठरेल, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत असताना गावात तब्बल सहा दिवसांनी नळाला पाणी येते. त्यामुळे सध्या कोल्हार खुर्दमध्ये पाणी टंचाईचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे.
मात्र गेल्या सहा महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या पाणी योजनेचे काम आत्तापर्यंत काही अंशी पूर्ण झाले असते तर कदाचित ग्रामस्थांना दिलासा मिळाला असता, मात्र तसे होताना दिसत नसल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहे. एकीकडे जिल्ह्यात जलजीवन योजनेची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर होऊन सुरूही झाली आहेत. अनेक कामे प्रगतीपथावर असताना कोल्हारची कामे संथगतीने सुरू असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.