पिंपरी, (प्रतिनिधी) – एक काळ असा होता जेव्हा आपला देश जगाला अन्न, आयुर्वेद औषधाचा पुरवठा करीत होता. प्राचीन परंपरेमध्ये ज्ञान, विज्ञान भरभरून आहे, असे मत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. मातंग साहित्य परिषदेतर्फे काळेवाडी येथे आयोजित दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनात ते बोलत होते.
परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्राचर्य अनिरुद्ध देशपांडे, निलेश गद्रे, अमित गोरखे, अंबादास सकट, संदीपान झोंबाडे, आदी उपस्थित होते. संमेलनाची सुरुवातीस ७० जोडप्यांच्या हस्ते महायज्ञ करण्यात आला. तसेच ग्रंथ दिंडी काढण्यात आली. महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून तसेच तुळशीला पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
गिरीश प्रभुणे म्हणाले की, अनेक ऋषी बहुजन समाजातील होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे समाजातील कुप्रथांवर प्रहार केला. मातंगऋषी यांच्या नावाने होत असलेल्या संमेलनाच्या माध्यमातून समाजासाठी मोलाचे कार्य होत आहे, असे मत दिलीप कांबळे यांनी व्यक्त केले. डॉ. सदानंद भोसले यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची महती विशद करून साठे यांचे साहित्य विविध भाषांमध्ये यावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. समाजजीवनात वावर असणाऱ्या व्यक्तींनी साहित्याचे वाचन करावे अशी अपेक्षा अमित गोरखे यांनी व्यक्त केली.