प्रभचत वृत्तसेवा पुणे, दि. 25-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांच्या ई-केवायसीचे काम 100 टक्के पूर्ण करण्यासाठी दि. 31 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या विविध माध्यमांतून प्रसिद्ध करणे, गावपातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क करणे तसेच विशेष शिबिरे घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे अनिवार्य असून, त्याशिवाय यापुढील लाभाचे हप्ते लाभार्थ्यास मिळणार नाहीत. मोहिमेच्या माध्यमातून ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येणार असून, ग्रामपंचायत कार्यालय, चावडी, तलाठी कार्यालय, विकास संस्था, बॅंक, पतसंस्था यांच्या नोटीस फलकावरही तत्काळ लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दवंडी देऊनही याबाबतची माहिती देण्यात येणार आहे.
ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, कोतवाल, पोलीस पाटील, सरपंच यांच्यामार्फत प्रलंबित यादीतील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क करुन ई-केवायसीचे महत्व व कार्यपद्धती समजावण्यात येईल व मोबाईलद्वारे प्रक्रीया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ई-केवायसी प्रकरणी संनियंत्रणासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या नेमण्यात आल्या असून प्रत्येक गावामध्ये सनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.