- ऑनलाइन शिक्षणासाठी नेटवर्क गायब, तर कधी विद्युत पुरवठा खंडित
खालापूर : करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आला. सध्या अनलॉक असला तरी शाळा महाविद्यालये बंदच आहेत, तर लॉकडाऊन काळात अनेक खासगी शाळांनी आपली आर्थिक उलाढाल बंद होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धती सध्या सुरू केली आहे. मात्र राज्यातील दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या आणि आदिवासी दुर्गम भागातील मुले या ऑनलाईन शिक्षण प्रणालीपासून आजही वंचित असल्याचे पाहायला मिळत आहे.
बहुतेक भागात नेटवर्क नाही, वीजच नाही त्या भागात मोबाईल आणि ऑनलाईन शिक्षण ही संकल्पनाच विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना माहितच नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणामुळे गोंधळ उडाला असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत आहे.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शासनाने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे साधे मोबाईल आहेत. काहीकडे ते ही नाहीत. ज्यांच्याकडे ऍण्ड्रॉईड मोबाईल आहेत, त्यांना नेटवर्क मिळत नसल्याने परिसरात ऑनलाइन शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत आहे.
करोना विषाणूपासून मुलांना संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाने शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण पद्धत सुरू केली आहे.
परंतु याचा फक्त शहरी भागातीलच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा लाभ मिळत आहे. काही ग्रामीण भागातील विद्यार्थी यापासून वंचित राहिल्याने त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तर काही मुले वाड्या-वस्त्यावर रहात असल्याने अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नाही. त्यातच काही कंपनीचे टॉवर सुरू आहे, परंतु नेटवर्क मिळत नाही. मिळाले तरी ते खूप धीम्यागतीने चालते. काही ठिकाणी तर ते ही चालत नाही.
तसेच जे गरीब विद्यार्थी आहेत, त्यांच्या कुटुंबाची असा महागडा मोबाईल घ्यायची ऐपत नाही. ते तर या शिक्षण पध्दतीपासून पूर्णपणे वंचित राहिले आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा ग्रामीण भागात बट्ट्याबोळ झाला असून, आजही अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत.
“कोविड’ महामारीच्या संकटामुळे शाळा सुरू होणे लांबणीवर पडल्याने सध्या ऑनलाइन शिकवणी चालू आहे. मात्र, काही ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. नेटवर्क मिळवण्यासाठी घरापासून लांब जावे लागते. त्यामुळे मन:स्ताप सहन करावा लागत आहे. शिक्षणावरही परिणाम होत आहे.
– विद्यार्थी