थिरथहल्ली – कर्नाटकाच्या निवडणुक प्रचारातही पंतप्रधान मोदी केवळ स्वताबद्दलच बोलत आहेत, त्यांना अन्य इतर कोणत्याही बाबींची पर्वा दिसत नाही अशी खिल्ली कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज येथील निवडणूक प्रचार सभेत बोलताना उडवली. कर्नाटकातील भाजपच्या भ्रष्टाचाराबद्दल मोदी कधी बोलणार असा सवालही त्यांनी केला.
मोदी या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्री बोम्मई, येडियुरप्पा किंवा अन्य कोणत्याही भाजप नेत्यांचे नावही घेताना दिसत नाहीत असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. कर्नाटकात 10 मे रोजी होणारी निवडणूक मोदींसाठी नव्हे तर कर्नाटकातील नागरीक आणि त्यांच्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाची आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की मी प्रत्येक प्रचार सभेत बोलताना सिद्धरामैय्या, डी. के. शिवकुमार, मल्लिकार्जून खर्गे यांची नावे घेतो, पण मोदींना कधी तुम्ही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची नावे घेताना पाहिले आहे काय असा सवालही त्यांनी केला. मोदी भाजपच्या नेत्यांची नावे का घेत नाहीत असा प्रश्न कर्नाटकातील अनेकांना पडला आहे. त्यांची नावे घेण्यात त्यांना का कमी पणा वाटतो आहे असा सवालही त्यांनी केला.
राज्याचे गृहमंत्री अरगा जनेंद्र यांच्या काळात उपनिरीक्षक भरतीत प्रचंड आर्थिक भ्रष्टाचार झाला. म्हणून त्यांचे नाव घेण्यासही मोदींना कमी पणा वाटतो आहे असे त्यांनी लक्षात आणून दिले. कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात अन्य नेते येथील विकास, येथील समस्या, या विषयांवर बोलताना दिसतात पण मोदी कधीच हे विषय घेत नाहीत. मोदी हे केवळ नरेंद्र मोदी यांच्याविषयीच बोलताना तुम्हाला दिसतील असे ते म्हणाले. भाजपच्या सरकारने कर्नाटकात गेल्या तीन वर्षान नेमकी काय कामे केली हेही मोदी तुम्हाला सांगताना दिसत नाहीत.
कर्नाटकात भाजपने चोरी करून सत्ता मिळवली आहे, त्यांनी लोकशाहीं गाडून सत्ता मिळवली आहे. तुम्ही जर तुमच्या भ्रष्ट नेत्यांची नावे घेताना घाबरत असाल तर त्यांच्या भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तरी तुम्ही नेमके काय केले हे येथील जनतेला समजाऊन सांगा असे आव्हानही राहुल गांधी यांनी यावेळी मोदींना केले.
कर्नाटकातील कंत्राटदारांच्या संघटनेने मोदींना थेट पत्र लिहून येथील प्रत्येक सरकारी कंत्राटामध्ये चाळीस टक्के कमिशन घेतले जात असल्याचा केला आहे, पण त्या पत्रावर उत्तर देण्याचे धाडस ते दाखवू शकले नाहीत असेही राहुल गांधी यांनी निदर्शनाला आणले. ही निवडणूक मोदींच्या भवितव्याची नाही तर तुमच्या भवितव्यासाठी आहे, तुम्ही तुमचे भवितव्य निश्चीत करा मोदींच्या भवितव्याची तुम्ही काळजी करण्याची गरज नाही असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.