केंदूर -करंदी व जातेगाव खुर्द (ता. शिरूर) हद्दीतून जाणाऱ्या चासकमान धरणाच्या कोरेगाव-धानोरे चारीला पाणी सोडण्याची मागणी करूनही पाणी मिळत नसल्याने जातेगाव खुर्दच्या शेतकऱ्यांनी चक्री उपोषण सुरू केले होते; मात्र चासकमानच्या अधिकाऱ्यांनी विनंती करीत वरिष्ठांशी चर्चा करून रविवारी (दि. 10) पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर उपोषणस्थळी एकदम 200 शेतकरी उपस्थित झाल्याने काहीकाळ भंबेरी उडाली होती.
चासकमानच्या पाण्यासाठी शिरूरच्या पूर्व आणि पश्चिम भागाचा नेहमीच तिढा पाहायला मिळतो. दरवर्षी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे अधिकारी शेतकऱ्यांचा घसा कोरडा ठेवत असल्याचा आरोप शेतकरी करीत होते. मात्र अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके, बाप्पूसाहेब मासळकर, बाळासाहेब चव्हाण, राजाराम केवटे आणि जितेंद्र खंडाळे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याला कळवून बुधवारी (दि. 6) सायंकाळी चक्री उपोषण सुरू केले.
गुरुवारी (दि. 7) सकाळपासून उपोषणस्थळी 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला. सहाय्यक अभियंता प्रेमनाथ शिंदे, धरण शाखा अभियंता उत्तम राऊत, शाखा अभियंता महेंद्र गायकवाड यांनी चर्चा करीत वरिष्ठांशी संवाद साधून अखेर पाणी सोडण्याची मागणी मान्य करून उपोषण थांबण्यात यश मिळविले आहे. आवर्तन सुरू करताना शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अवर्तनाच्या तारखा अगोदर कळविण्यात याव्या त्याचबरोबर आवर्तन कालावधी ठरविताना कालवा सल्लागार समितीमध्ये प्रत्यक्ष लाभक्षेत्रातील 3 ते 4 शेतकऱ्यांना समाविष्ट करून घेऊन विश्वासात घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करून उपोषण थांबवण्याची विनंती केली होती; मात्र शेतकरी लेखी आश्वासनावर ठाम होते. दरम्यान, ऍड. अशोक पलांडे यांनी अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांची बाजू मांडली त्यानंतर अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले.