मुंबई – प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन घट झाल्याने देशभरात टोमॅटोची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे मुंबईसह देशातील अनेक शहरांत टोमॅटोचे दर 150 पार गेले आहेत. विशेषत: उत्तर भारतात टोमॅटोच्या दरांनी अचानक उसळी घेतली असून, उत्तराखंडमधील काही शहरांत 200 ते 250 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री होत आहे. अशात आता टोमॅटो महागल्याने पडसाद सोशल मीडियावर देखील पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर टोमॅटो महागाईचे मिम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
अशात टोमॅटोच्या किमतीवरून आता काही नेटकऱ्यांनी थेट गाणंच बनवाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘टोमॅटो सॉंग’ या नावाने सध्या हे गाणं तुफान व्हायरल होतंय. खुशल पवार नामक सोशल मीडिया इन्फ्ल्यूनसरने हे गाणं बनवलं असून सोशल मीडियावर हे मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय.
“जनता की लाल हुई जबसे हुआ महंगा टमाटर.. सर पीट रहें सब्जी, सांबर बनें कैसे बिना टमाटर.. पावभाजी बिना टमाटर, शेवभाजी बिना टमाटर.. चिकन करी, अंडा करी, टोमॅटो सूप बिना टमाटर” असे बोल असलेलं हे गाणं सध्या अनेकजण शेर करत वाढत्या टोमॅटोच्या दरावर मिश्किल भाष्य करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
मुंबई आणि परिसरातही टोमॅटोला 120 ते 160 रुपये किलो असा भाव मिळत आहे.तीव्र उन्हामुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होऊन दरवर्षी जून-जुलै महिन्यात त्याचे दर वाढतात. मात्र, यंदा दराने अभूतपूर्व उच्चांक गाठला आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवडयापर्यंत 30 ते 35 रुपये किलो दर असलेल्या टोमॅटोचा भाव जूनअखेरीपासून वाढला असून, गेल्या दहा दिवसांत हे दर जवळपास चार पटीने वाढले आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यापासून टोमॅटोच्या दरांत 445 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.