– डॉ. अ. ल. देशमुख,
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
कोविड संकटामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परीक्षा झाली नाही याचा अर्थ आपले शिक्षण झाले नाही, असा कृपया चुकीचा अर्थ पालकांनी वा विद्यार्थ्यांनी काढू नये.
इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी या दोन्हीही वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षा शासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर रद्द केलेल्या आहेत. इयत्ता दहावीच्या मूल्यांकनाचा आराखडा तयार करून तो शाळांना पाठवलेला आहे. त्यामुळे दहावीच्या मूल्यमापनाचा प्रश्न निकाली निघालेला आहे. आता इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे हा यक्षप्रश्न सर्वांसमोर आहे. प्रथमतः आपण मूल्यांकनाच्या काही मार्गांचा विचार करूया.
इयत्ता बारावीला आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स असे तीन विभाग आहेत. त्यामुळे त्यांच्या मूल्यांकनासाठी कुठलाही नवा मार्ग शोधण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण समजावे व त्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण असे प्रमाणपत्र न देता विद्यार्थ्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी व त्या क्षेत्रातील पुढील अभ्यासक्रमासाठी पात्र अशा स्वरूपाचे प्रमाणपत्र द्यावे. यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही.
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील अभ्यासक्रम निवडायचे असतील तर त्या-त्या क्षेत्रातील प्रवेश परीक्षा घेऊन त्यांना प्रवेश द्यावेत. इंजिनिअरींग आणि मेडिकल यासाठी तर सीईटी, नीट आणि जेईई या प्रवेशासाठीच्या स्पर्धा परीक्षा तर होणारच आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या दोन शाखांना जायचे नाही आणि त्यांना एफवाय कॉमर्स, आर्टस् आणि सायन्सला जायचे असेल
त्यांच्यासाठी त्या-त्या महाविद्यालयांनी किंवा विद्यापीठांनी त्यांच्या प्रवेश परीक्षा जाहीर कराव्यात. त्याचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचे स्वरूपही त्यासोबत जाहीर करणे आवश्यक आहे. तिसरा मार्ग म्हणजे शहरांमधून दर्जेदार किंवा गुणवत्तापूर्ण महाविद्यालये, सर्वसाधारण महाविद्यालये व कमी गुणवत्तेची महाविद्यालये अशी रचना संपूर्ण महाराष्ट्रभर आहेच.
दर्जेदार महाविद्यालयांनी त्यांची स्वतःची प्रवेश परीक्षा ठेवावी. जे विद्यार्थी सामान्य प्रतीचे आहेत त्यांनी विनाकारण या दर्जेदार महाविद्यालयात जाण्याचा आग्रह धरू नये. ज्या शैक्षणिक संस्थेत महाविद्यालयीन प्रवेश मिळेल तिथे तो प्रवेश निश्चित करून आपले पुढील शिक्षण सुरू ठेवावे.
मात्र प्रत्येक विद्यार्थ्याने हे लक्षात ठेवावे की आपले स्वतःच करिअर घडवायचे असेल तर महाविद्यालयांपेक्षाही आपली स्वतःची इच्छा, क्षमता, प्रयत्न आणि कष्ट हे जीवनात यश मिळवण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे निराश न होता नेटाने प्रयत्न करणे सुरू ठेवावे. आपल्या विद्यार्थ्यांची मानसिकता याबाबतीत पालकांनी सक्षम करावी.
कोविड 19च्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये आपल्याला काही आमूलाग्र बदल करावे लागतील. ते म्हणजे सर्व उद्योजकांनी म्हणजेच लघु उद्योजक ते उच्च गुणवत्तेचे उद्योजक यांनी या सर्व औद्योगिक विश्वाने त्यांचे स्वतःचे ऍप्रेंटिस वर्ग सुरू करावेत. टेल्को ऍप्रेंटिसशिपची योजना आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्या योजनेच्या जोरावरच टेल्को ही कंपनी जागतिक पातळीवरील स्पर्धेत टिकली आणि मोठी झाली.
त्यामुळे प्रत्येक इंडस्ट्रीने शिक्षण क्षेत्रातल्या या परीक्षेविना आलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील निराशा कमी करण्यासाठी त्यांना आपल्या ऍप्रेंटिस वर्गामध्ये घेऊन त्यांना आधार द्यावा. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही विनाकारण मला एव्हरेस्टच्या शिखरावरच जायचे आहे, अशी मानसिकता सद्यस्थितीत ठेवू नये. आपल्या पाल्याची क्षमता काय आहे, याचा नीट आणि सारासार विचार करावा. कारण ही वेळ आत्ता आलेली आहे.
जसे औद्योगिक क्षेत्रामध्ये ही क्रांती होण्याची आवश्यकता आहे तशाच प्रकारे केंद्र शासनाने किंवा राज्य शासनानेही विद्यार्थी भरकटत जाणार नाहीत किंवा निराशेच्या गर्तेत सापडणार नाहीत, यासाठी छोट्यातल्या छोट्या गावापासून ते शहरापर्यंत समुपदेशन केंद्रे उघडावीत. या समुपदेशन केंद्रांमधून परीक्षेविना बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे समुपदेश करून त्यांच्या भविष्याची दिशा किंवा वाटचाल सकारात्मक होईल असा प्रयत्न करावा.
शासनाकडे असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण वाढवून त्वरित हे बारावीतून बाहेर पडलेले विद्यार्थी नोकऱ्यांमध्ये सामावून कसे घेता येतील याचाही विचार गांभीर्याने करण्याची गरज आहे.
परीक्षा झाली नाही याचा अर्थ आपले शिक्षण झाले नाही असा कृपया चुकीचा अर्थ पालकांनी वा विद्यार्थ्यांनी काढू नये. तुम्ही इयत्ता पहिली ते बारावी उत्तम अभ्यास करून आवश्यक तेवढे ज्ञान मिळवलेलेच आहे. फक्त कोणी किती मिळवले आहे, याचा अंदाज आपल्याला परीक्षेमधून येत असतो. तो आलेला नाही. याचा अर्थ ज्ञानच नाही असा होत नाही. मिळालेल्या ज्ञानाचा वापर कसा करावा, कुठे करावा, किती करावा याचा शांतपणाने विचार विद्यार्थी व पालकांनी केला पाहिजे.
विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे की शहरी आहे, असा विचार न करता सर्वच विद्यार्थी आपले आहेत, असे मानून ज्ञानी किंवा धनिक पालकांनी अज्ञानी किंवा गरीब पालकांना किंवा त्यांच्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन, सहकार्य करावे. यावरच समाजाची गुणवत्ता किंवा सामाजिक विकासाची उंची अवलंबून आहे.
प्रत्येक धनिकांनी, सज्ञानी, सुशिक्षित पालकांनी आपल्या पाल्याबरोबर असा एक गरजू पाल्य विकासाबाबत दत्तक घेतल्यास सर्व समाजच मोठा होईल. या सकारात्मक विचारसरणीची समाजाला गरज आहे. परीक्षा झाल्या नाहीत म्हणून कृपया कोणी निराश न होता, आपण एकत्रितपणाने याचा सामना करूयात आणि या विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करूयात.