सातारा-सध्या जिल्ह्यातील पोलीस व इतर शासकीय यंत्रणा करोनाचा सामना करण्यात व्यगॅ आहेत. ग्रामीण भागातील बंदोबस्तासाठी पोलीस मुख्यालयातून पोलीस किंवा गृहरक्षक दलाचे जवान दिले आहेत. मात्र, वडूज पोलिसांना करोनाच्या संकटापेक्षा शेतात राबणाऱ्यांकडून “खाबुगिरी’ करणे महत्त्वाचे वाटत आहे. पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवत गणेशवाडीतील शेतकऱ्यांना वेठीस धरले होते. किमान करोनाचे संकट जाईपर्यंत तरी वडूज पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी जरा दमाने घ्यावे, अशी चर्चा तालुक्यात आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये, म्हणून जिल्हाभर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वडूज (ता. खटाव) येथेही बंदोबस्त आहे. मात्र, पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी लोकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांचा वापर करण्याऐवजी नदीकाठावर गस्त घालण्यासाठी केल्याचे समोर आले आहे.
नदीकाठची गस्त घालून वडूजच्या कारभाऱ्यांचा लाडका असलेला एक पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे तीन जवान वडूजकडे निघाले होते. ट्रॅक्टर, जेसीबी कुठं दिसतात का, हे त्यांनी नदीकाठावरून पाहिले. मात्र, हाताला काहीच न लागल्याने आता साहेबांना काय सांगायचे, असा प्रश्न त्यांना पडला. त्याच वेळी गणेशवाडी (खटाव) येथे एका शेतात ट्रॅक्टर व जेसीबीच्या साह्याने काम सुरू असल्याचे हवालदाराला दिसले. वाहनमालक व शेतकरी कामात व्यग्र असतानाच पोलीस गाडी अचानक बांधावर थांबल्याने ते गोंधळले. नेमका त्याचाच फायदा घेत साहेबांच्या त्या लाडक्या हवालदाराने वाहनमालक व शेतकऱ्याला कायद्याचा धाक दाखवला. त्यामुळेही डाळ शिजत नसल्याने थेट कारभाऱ्यांना फोन करून प्रकरण गंभीर आहे, असा रंग भरण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रकरण साहेबांकडे जात असल्याने वाहनमालक व शेतकरी गोंधळला. तुम्हीच काही तरी करा, असे आर्जव त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला केले. मग, काय तोडपाणीत हातखंडा असलेल्या त्या लाडक्याने साहेबांनाच घटनास्थळी बोलावून घेत गृहरक्षक दलाच्या जवानांना दूर उभे राहण्याचा इशारा केला. त्यानंतर वाहनमालक व शेतकऱ्याने खूप मोठा गुन्हा केला आहे, असा आव आणत “काय देताय’ असा प्रश्न केला. आधीच दुष्काळ त्यात करोना असल्याने वाहनमालकाने, उगाच भानगड नको म्हणून तयारी दाखवली. त्यामुळे प्रकरण जागेवरच दडपून साहेब व त्यांचा लाडका कर्मचारी, जणू काही घडलेच नसल्याच्या आविर्भावात पोलीस ठाण्याकडे रवाना झाले. मात्र, माजंराने डोळे मिटून दूध पिले तरी ते इतरांना ते दिसते, याचा प्रत्यय साहेब व कर्मचाऱ्याला आला.