नवी दिल्ली – गुजरातमधील मोरबी झुलता पूल कोसळण्याच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना पुरेशी आर्थिक आणि तातडीची वैद्यकीय मदत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
येथे पत्रकारांशी बोलताना खर्गे म्हणाले की, पाच दिवसांपूर्वी पुन्हा सुरू झालेला पूल कोसळण्याची कारणे जाणून घेतली पाहिजेत.
एवढ्या लोकांना एकाच वेळी पुलावर जाण्याची परवानगी का देण्यात आली? असा सवाल करीत त्यांनी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.आमचे (कॉंग्रेस)
नेते तिथे पोहोचले आहेत. अशोक गेहलोतही पोहोचत आहेत. आम्ही शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करू. आम्हाला यावर कोणतेही राजकारण करायचे नाही किंवा अशा वेळी कोणावरही आरोप करायचे नाहीत. चौकशीचा अहवाल आल्यावरच त्यावर बोलता येईल असे ते म्हणाले.