नितीन राऊत
वडूज – दुष्काळी खटाव तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. नेर सोडून तालुक्याच्या पूर्व भागातील येरळवाडीसह सर्वच तलाव, धरणे आणि बहुतांश विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत. प्रशासनाकडून ३० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ११ गावांना विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवले जात आहे. पशुधनाच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागत असून पशुपालक मेटाकुटीला आला असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. येणाऱ्या दोन महिन्यांत टंचाई आणखी तीव्र होणार असून दुष्काळाची दाहकता रौद्ररूप धारण करणार आहे.
खटाव तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. तालुक्याच्या दक्षिण आणि उत्तर भागात डिसेंबर महिन्यापासूनच टंचाई जाणवू लागली होती. जिहे- कठापूर योजनेचे पाणी नेर धरणात आणि उरमोडीचे पाणी लाभक्षेत्रात सोडल्याने काही भागात टंचाई थोडी सुसह्य झाली होती. मात्र, आता पुन्हा टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. ज्या भागात कोणत्याच योजनेचे पाणी जात नाही त्या भागात दुष्काळाने हाहाकार उडाला आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तालुक्यातील बहुतांश विहिरींनी तळ गाठला आहे. येरळा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. तर येरळवाडी धरणातील पाणीसाठा कमी झाला असून त्यावर तालुक्यातील पूर्व भागातील बहुतांशी नळपाणीपुरवठा योजना असून धरण कोरडे पडल्याने या योजनांना घरघर लागली आहे. त्यामुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या गावातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
पाणीच नसल्याने उन्हाळी तसेच बागायती पिके वाया जाऊ लागली आहेत. फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील सर्वच पाणीसाठे कोरडे पडल्याने आसपासच्या कूपनलिकांचेही पाणी बंद झाले आहे. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने प्रशासनाकडे टैंकर मागणीचे प्रस्ताव वाढू लागले आहेत. खटाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना मायणी फिडिंग पॉईंटवरून पाणीपुरवठा केला जात आहे तर तालुक्यातील बहुतांश विहिरींनी तळ गाठला आहे.
४१ गावे, १०७ वाड्या वस्त्यांवर टैंकर
खटाव तालुक्यात आजच्या घडीला ३० टँकरच्या ६७ खेपांद्वारे ४१ गावे आणि १०७ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. ६६ हजार २९५ लोकसंख्येला आणि १२ हजार १४१ जनावरांची तहान टँकरद्वारे भागवली जात आहे. १९ गावांना विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहण करुन पाणी दिले जात आहे. आणखी काही गावांचे टँकरसाठीचे प्रस्ताव मागणी होत आहे. पशुधनाच्या चाऱ्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने उन्हाळी पिके वाया गेली आहेत. ज्या भागात उरमोडी, जिहे कठापूरचे पाणी पोहचले होते, त्या भागात थोडा फार चारा उपलब्ध झाला आहे. मात्र, तालुक्याच्या बहुतांश भागात जनावरांच्या चाऱ्याची वाणवा आहे. शेतकऱ्यांना पशुधनाच्या पाणी आणि चाऱयासाठी धावाधाव करावी लागत आहे.
नेर, मायणी वगळता तलावांत खडखडाट
खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील नेर धरणात जिहे कठापूर योजनेचे पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे सध्या धरणात ३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मायणी तलावात ०.१३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच फक्त ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शिरसवडी तलावात ५ टक्के पाणी आहे.
हे पाणी कडक उन्हाळ्यातील बाष्पीभवनामुळे टिकण्याची शक्यता फार कमी आहे. येरळवाडी, कानकात्रे, पळसगाव, सूर्याचीवाडी, कलेढोण (कटकाळी तलाव ), विखळे कटकाळी तलाव, पाचवड, तरसवाडी तलाव, येळीव, दरुज दरजाई तलाव, पेडगाव तलाव, वाकेश्वर बंधारा, वडूज येथील बंधारा कोरडा पडला आहे. येळीव, पेडगाव, सातेवाडी, डांभेवाडी, कानकात्रेवाडी तलावांमध्ये पाण्याचा खडखडाट असल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे.
पाणीपुरवठ्यासाठी कसरत
मायणी फिडिंग पॉईंट, शिरसवडी ग्रामपंचायत विहीर, बनपुरी खासगी कूपनलिका, नेर धरणातील विसापूर, पवारवाडी ग्रामपंचायत विहिरींमधून सध्या टँकर भरले जात आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. संपूर्ण एप्रिल आणि मे महिना तसेच जूनचे काही दिवस टंचाईची दाहकता वाढणार आहे. यापुढील दोन महिन्यांच्या काळात प्रशासनाला पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर पशुधन जगवण्याचा प्रयत्न पशुपालक करत आहेत.