नवी दिल्ली – भारत आणि म्यानमार ( India Myanmar ) दरम्यान परराष्ट्र कार्यालयांतर्गत होणारी चर्चेची २० वी फेरी आज नवी दिल्लीत पार पडली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही देशांदरम्यानच्या सीमाभागातील वातावरण आणि सुरक्षा, व्यापार, वाणिज्य आणि संलग्नतेसारख्या मुद्यांवर चर्चा झाली, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी केले तर म्यानमारच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व म्यानमारचे उप परराष्ट्र मंत्री यू लविन ओ यांनी केले. या बैठकीदरम्यान, म्यानमारमधील द्विपक्षीय विकास प्रकल्पांची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांशी संबंधित मुद्यांवरही चर्चा झाली.
भारतीय बाजूने म्यानमारच्या लोकांच्या फायद्यासाठी राखाईन राज्य विकास कार्यक्रम आणि सीमा क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत कनेक्टिव्हिटी प्रकल्प आणि सामाजिक-आर्थिक विकास प्रकल्पांना भारताचा पाठिंबा व्यक्त केला.