चीन, पाकिस्तानला स्पष्ट संदेश देणारी कृती
नवी दिल्ली -भारताने नुकतीच अरबी समुद्रात आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू नौका तैनात केली. चीन आणि पाकिस्तान या दोन शेजाऱ्यांना स्पष्ट संदेश देणारी कृती म्हणून त्या घडामोडीकडे पाहिले जात आहे.
चीन आणि पाकिस्तानने उत्तर अरबी समुद्रात संयुक्त नौदल सराव सुरू केला आहे. सोमवारपासून सुरू झालेला तो सराव नऊ दिवस चालणार आहे. त्या सरावाच्या पार्श्वभूमीवर भारत पूर्ण सतर्कता आणि सज्जता बाळगून आहे. त्यातूनच चालू आठवड्याच्या प्रारंभी भारताने विमानवाहू नौका तैनात केली. त्यावेळी भारतीय नौदल मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आयएनएस विक्रमादित्य ही जगातील सर्वश्रेष्ठ विमानवाहू नौकांपैकी एक मानली जाते. तरंगते हवाई तळ अशा शब्दांत त्या नौकेचा उल्लेख केला जातो. त्यामुळे ती नौका तैनात करण्याच्या भारताच्या कृतीला मोठे महत्व आहे. उत्तर अरबी समुद्रातील अस्तित्व विस्तारण्याचा प्रयत्न चीनकडून सातत्याने सुरू आहे. तर, काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला आहे. भारताच्या तैनातीमागे ती पार्श्वभूमीही असल्याचे मानले जात आहे.