नवी दिल्ली : जागतिक बॅंकेने आज जाहीर केलेल्या व्यापार सुलभीकरण अहवालात (2020) भारताने 77 व्या स्थानावरून 63 वे स्थान पटकावले आहे. या अहवालात 190 देशांची तुलना करण्यात आली आहे. 2015 पासून भारत व्यवसाय सुलभीकरणात सातत्याने भरीव कामगिरी करत असून सलग तिसऱ्या वर्षी यात नेत्रदीपक प्रगती दिसून आली आहे. सलग तिसऱ्या वर्षी भारत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 10 देशांमध्ये समाविष्ट आहे. गेल्या पाच वर्षात भारताने 79 स्थानांची प्रगती केली आहे.
या अहवालातील 10 पैकी सात वर्गांमध्ये भारताची कामगिरी सुधारली असून ती सर्वोत्तम देशांच्या जवळ पोहोचली आहे. दिवाळखोरीचा निपटारा, बांधकाम परवाने, मालमत्ता नोंदणीकरण, सीमेपलिकडील व्यापार आणि कर भुगतान या क्षेत्रांमध्ये भरघोस सुधारणा दिसून आली आहे.
जागतिक बॅंकेनुसार सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रमुख 10 देशांमध्ये भारत सहभागी आहे. दिवाळखोरीतून देण्यांची वसूली होण्याचे प्रमाण 26.5 टक्क्यांवरून 71.6 टक्क्यांवर गेले आहे. दिवाळखोरी अंमलात आणण्याचा कालावधी 4.3 वर्षांवरून 1.6 वर्षांवर आला आहे. बांधकाम परवाने देण्याच्या प्रक्रियेतील टप्पे कमी केले गेले आहेत. दक्षिण आशियाई देशांमधील भारताचे आघाडीचे स्थान कायम असून 2014 मध्ये भारत सहाव्या स्थानी होता.