PM Narendra Modi – खेळ हे पदक जिंकण्यासाठी नसतात, तर खेळातून हृदय जिंकले जाते. खेळात जगाला जोडण्याची क्षमता असते असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनी भारत 2036 मधील ऑलिम्पिक (2036 Olympics) स्पर्धेच्या संयोजनासाठी सज्ज असल्याचे निःसंदिग्ध अशी ग्वाही दिली.
तसेच त्यांनी यावेळी 2029 मध्ये होऊ घातलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनाचीही तयारी दर्शवली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या अधिवेशनाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
त्याप्रसंगी ते बोलत होते. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय प्राचीनात्वाच्या खूणा आणि वैविध्यपूर्ण परंपरा आणि कला, नृत्य आणि संस्कृतींचा परिचय करून देणारा नजराणाच जगभरातील प्रतिनिधींसमोर सादर करण्यात आला होता.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, भारत वेगाने वाटचाल करणारी अर्थव्यवस्था आहे. आमच्याकडे उत्तम पायाभूत सुविधा आहेत. गेल्या काही वर्षांत आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक क्रीडा स्पर्धांचे यशस्वीपणे संयोजन केले आहे. भारताला जी-20 चे अध्यक्षपद मिळाले.
या काळात आम्ही भारतातील विविध शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. आता कोट्यवधी भारतीय जनतेला ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनाची संधी मिळावी अशी आस लागून राहिली आहे.
आम्ही 2036 मधील ऑलिम्पिकचे यशस्वीपणे संयोजन करू शकतो असा विश्वास आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी भारतीयांच्या क्रिकेट प्रेमाचा उल्लेख केला.
तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाने क्रिकेटचा ऑलिम्पिक मध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे आणि आम्ही त्याबाबत लवकरच सकारात्मक बातमी ऐकण्याची आशा करत आहोत असा आशावादही त्यांनी प्रकट केला.
याचवेळी त्यांनी अहमदाबाद येथे झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना, भारतीय संघाचे अभिनंदन केले.
प्राचीन क्रीडा परंपरेचा उल्लेख !
पंतप्रधान मोदींनी यावेळी भारतातील प्राचीन क्रीडा परंपरेचा देखील आढावा घेतला. ते म्हणाले, भारतातील गावागावांत विविध खेळांची परंपरा आहे. या गावात प्रत्येक सणाला वेगवेगळ्या खेळ खेळण्यांची प्रथा आहे. आमची क्रीडा परंपरा समृद्ध आहे. प्राचीन ग्रंथामध्ये 64 विद्यांचा उल्लेख आढळतो.
त्यामध्ये अश्वारोहण, धनुर्विद्या, जलतरण आणि मल्लविद्या यांचा समावेश आहे. धनुर्वेद अशी स्वतंत्र संहिता आहे. कच्छ येथील उत्खननात धौलाविरा परिसरात पाच हजार वर्षांपूर्वीचे प्रेक्षागृह आढळले आहे. राक्षीगढी येथेही असे जुने अवशेष सापडले आहेत.
खेळात कुणी हारणारा नसतो. तर खेळाडू हा विजेता आणि शेवटपर्यंत शिकणारा असतो याचा उल्लेख करून आणि भारत हा “वसुधैव कुटुंबकम्’ची संकल्पना मांडणारा देश असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला.