नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिवस-रात्र कसोटी क्रिकेट मालिकेला अद्यापही मंजुरी दिलेली नसली तरीही आगामी काळात कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात सहमती झाल्यास लवकरच डे-नाईट कसोटी क्रिकेटला चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रकाशझोतातील कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली तयार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले आहे. बीसीसीआयच्या मुख्यालयात कोहलीशी झालेल्या बैठकीबाबत गांगुली म्हणाला, प्रकाशझोतामधील कसोटी सामने खेळण्यास कोहली तयार नाही, अशा प्रकारची चर्चा होत होती; परंतु यात तथ्य नाही. कसोटी क्रिकेटला पुढे जाण्यासाठी ते आवश्यक आहे. याबाबत आमचे एकमत झाले आहे. ईडन गार्डन्सवर बंगाल क्रिकेट संघटनेकडून झालेल्या सत्कारानंतर गांगुली बोलत होता.
बीसीसीआयने 2016 मध्ये हा प्रयोग दुलीप करंडकातून सुरू केला होता परंतु गुलाबी बॉल वापरल्याबद्दल अनेक तक्रारी आल्या. गोलंदाज आणि फिरकीपटू प्रामुख्याने तक्रार करतात की, त्यांनी वापरलेला गुलाबी चेंडू निकृष्ट दर्जाचा होता. जेव्हा बॉल सर्वात जास्त स्विंग करते तेव्हा संध्याकाळच्या वेळी गुलाबी बॉल पाहणे कठीण होते.
याउलट भारतीय संघदेखील डे-नाईट कसोटी सामने खेळण्यास उत्सुक नाही आणि शेवटच्या मालिकेदरम्यान त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची ऑफर नाकारली होती. गांगुली हा दिवस-रात्र कसोटी सामन्यांचा पाठीराखा आहे. गुलाबी एसजी कसोटी बॉल सर्वोत्तम गुणवत्तेचा नाही आणि जर रणजी करंडक स्पर्धेमध्ये ते श्रेणीसुधारित आणि पद्धतशीरपणे सुरू केले तर गुलाबी बॉल कसोटी सामन्यांत प्रत्यक्षात वापरले जाऊ शकतात, असे सांगण्यात
येत आहे.==